चिंचवड, ता. ११ ः डांगे चौकातून चिंचवडगावाकडे जाणाऱ्या पवना नदी पुलावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे वाहतूक खोळंबून वाहनचालकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे.
नदीवरील पुलाच्या मध्यभागी डाव्या बाजूचा रस्ता खाली असल्याने उतार तयार झाला आहे. त्या ठिकाणी खड्डाही निर्माण झाला आहे. परिणामी, पावसाचे पाणी त्या साचते आणि निघून जात नाही. या पाण्यामुळे वाहनचालकांना धोका निर्माण होत असून अपघाताची शक्यता वाढत आहे. याठिकाणी पावसाळी पाण्याची छिद्रे (व्हिपोल्स) आहेत की नाही ते पाहणे गरजेचे आहे. असतील तर पाणी बाहेर जात नाही. कारण, त्या छिद्रांमध्ये माती, दगड, प्लास्टिक आणि गाळ अडकल्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी पुलावरच साचून राहते. त्यामुळे तातडीने त्या छिद्रांची सफाई करणे आवश्यक आहे. जेणेकरून पावसाचे पाणी रस्त्यावर न साचता लगेच बाहेर जाईल. पाऊस पडण्यापूर्वी समस्येचे निराकरण न झाल्यास पुढील काळात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
पाणी जाण्यासाठी काही उपाययोजना आहेत का ? ते प्रत्यक्ष पाहणी करू. त्यानंतर आवश्यक त्या उपाय योजना करू जेणेकरून पाणी साचणार नाही.
- विजय भोजने, प्रकल्प अधिकारी, बीआरटीएस