मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतली आहे. पण आता पुन्हा एकदा मुंबईसह राज्यात पावसाचे पुनरागमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गुरुवारी (12 जून) मुंबई, ठाण्यासह नवी मुंबई आणि कोकण परिसरात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर, 12 जूनपासून पावसाला सुरुवात होईल आणि 14 जून पासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. दरम्यान 17 जून पर्यंत राज्यात वादळी वारे मेघगर्जनेसह विजांच्या कडगडाटासह कोकणात काही ठिकाणी जोरदार तर मध्यमहाराष्ट्र मराठवाडा,विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update IMD alert for Mumbai and Maharashtra)
हेही वाचा : Mumbai BMC : अखेर बीएमसी इंजिनियर्सना बढत्या मिळणार, नव्या नोकरभरतीने रिक्त पदेही भरणार
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. गुरुवारी दिवसभर आकाश ढगाळ राहणार असून वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किमी राहील. हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी मुंबईसह उपनगरांना यलो अलर्ट दिला आहे. पालघर जिल्ह्यात गुरुवारचा दिवस अंशतः ढगाळ राहणार असून दुपारी उन्हाचा तडाखा जाणवण्याची शक्यता आहे. पावसाची फारशी शक्यता नाही, पण दमट हवामानामुळे उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. कमाल तापमान सुमारे 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहणार आहे. वाऱ्याचा वेग सौम्य असून वातावरण स्थिर आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यालाही पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत जोरदार ते अतिजोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसतील. विशेषतः घाटमाथ्यालगतच्या भागांत आणि समुद्रकिनाऱ्यालगत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, सध्या देशामध्ये पावसाचे प्रमाण 32 टक्के कमी नोंदले गेले असताना हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जूनमधील पाऊस 108 टक्के असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने गुरुवारपासून कोल्हापूर आणि घाट परिसर तसेच सांगली जिल्ह्याला हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. तर, दक्षिण कोकणात शुक्रवारपासून (13 जून) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, विदर्भामध्येही अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथेही गुरुवारच्या दिवशी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण, या भागामध्ये मेघगर्जनांचे प्रमाण अधिक असेल. तसेच वाऱ्यांचाही वेग 50 ते 60 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.