Amlatti Dam Height : राधाकृष्ण विखे पाटलांची जलशक्ती मंत्र्यांशी चर्चा 'आलमट्टी'च्या उंचीला ठाम विरोध, इतर राज्यांशीही बोलले
esakal June 12, 2025 07:45 PM

Radhakrishna Vikhe Patil Oppose Amlatti Dam : आमलट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा ठाम विरोध आहे. याबाबत सरकारने आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांशीही चर्चा केली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी मी स्वतः बोललो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःयावर लक्ष ठेऊन आहेत, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. आज त्यांनी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आलमट्टीच्या उंची वाढवण्याच्या प्रस्तावाबद्दल मंत्री विखे-पाटील म्हणाले, ‘आलमट्टीची उंची वाढवण्याच्या भूमिकेला सरकारने विरोध केला नाही असे म्हणणे चुकीचे आहे. अद्याप याबाबत सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय दिलेला नाही. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांचाही उंची वाढवण्याला विरोध आहे. या राज्यांशी महाराष्ट्र शासनाने चर्चा केली आहे.

यांच्याशी मी स्वतः या संदर्भात बोललो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व घटनांवर लक्ष ठेऊन आहेत. आलमट्टीची उंची वाढवण्यास राज्य सरकारचा ठाम विरोध आहे.’

माजी मंत्री जयंत पाटील यांच्या विधानावर मंत्री विखे-पाटील म्हणाले, ‘जयंत पाटील यांचा आणि माझा फारसा संबंध नाही. मात्र त्यांनी त्यांच्या संघटनेचे अडचणीच्या काळातही नेतृत्व केलेला आहे. नवनवीन लोकांना संधी मिळायला पाहिजे; पण त्यांची भाजपमध्ये येण्यासंदर्भात अशी कुठलीही चर्चा झालेली नाही.’

अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू आहे. यावर विखे-पाटील म्हाणाले, ‘कोणी काय विचार करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, देशात भारतीय जनता पक्ष घटक पक्षांबरोबर सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कणखर नेतृत्व देशाला मिळाले आहे. राज्यात सर्वात जास्त आमदार भाजपकडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील.’

प्रभाग रचनेबाबत स्थानिक नेते निर्णय घेतील

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेबाबत विखे-पाटील म्हाणाले, ‘याचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेते घेतील. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजप हाच मोठा पक्ष असेल. महायुतीचे घर मोठे आहे त्यामुळे थोडे मतभेद होतात; पण त्यात फारसे मोठे काही नाही.’

कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंची वाढली तर याचा फटका महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील शेतकरी व नागरिकांना बसणार आहे. खास करून शिरोळ तालुक्याचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे आलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, अशी मागणी राज्य जनता दल सेक्युलर पक्षाचे राज्य सरचिटणीस प्रवीण माणगावे यांनी माजी पंतप्रधान व जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

बंगळूर येथे देवेगौडा यांची माणगावे, राज्य प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, राज्य कार्यकारणी सदस्य दीपक सातपुते यांनी भेट घेतली. यावेळी माणगावे यांनी कर्नाटक राज्याने आलमट्टी धरणाची उंची वाढवली तर याचे गंभीर परिणाम शिरोळ तालुक्याच्या जनजीवनावर होणार आहे.

तालुक्यातील सुमारे ४२ गावांना महापुराचा फटका बसतो. धरणाची पुन्हा उंची वाढविल्यास शेती व्यवसाय उद्ध्वस्त होणार आहे. याचा गांभीर्याने विचार करून आलमट्टी धरणाची उंची वाढविण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली. देवेगौडा यांनी याबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.