सुधांशू सोमण यांचे आज गायन
esakal June 13, 2025 11:45 PM

rat13p31.jpg-
70427
सुधांशू सोमण

सुधांशू सोमण
यांचे आज गायन
रत्नागिरी : खल्वायन संस्थेची ३१४व्या मासिक संगीत सभा उद्या (ता. १४) देवगड येथील सुधांशू सोमण याच्या शास्त्रीय तसेच अभंग-नाट्यगीत गायनाने रंगणार आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता गोदुताई जांभेकर विद्यालयात ही मैफल होईल. सुधांशू संगीत मंदारमाला या नाटकात गायक नटाची भूमिका करत आहे. त्याचे शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन प्रसाद शेवडे, पंडित राजाराम आंबर्डेकर, भाग्येश मराठे यांच्याकडून तर अभंग नाट्यगीताचे शिक्षण राजाभाऊ शेंबेकर यांच्याकडून घेतले आहे. तो संगीत विशारद असून, मुंबई विद्यापिठाच्या यूथ फेस्टिवलमध्ये त्याने राष्ट्रीय स्तरावर शास्त्रीय गायन, नाट्यसंगीत, भावसंगीत गायनाकरिता त्याला सुवर्णपदके मिळवली आहेत तसेच अष्टपैलू विद्यार्थी म्हणूनही त्याचा गौरव झाला आहे. त्याला विद्यापिठातर्फे ''गोल्डन बॉय'' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. सवाई गंधर्व महोत्सव, कुंदगोळ, ग्रीन रागा, मुंबई इत्यादी ठिकाणी त्याचे गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. उद्याच्या मैफलीसाठी त्याला देवगडचा युवावादक पार्थ परांजपे संवादिनीची साथ तर रत्नागिरीतील निखिल रानडे तबलासाथ करणार आहेत. रसिकांनी मैफलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.
------------
सावंतवाडी-पंढरपूर
विशेष गाडी हवी
खेड ः अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपुरातील विठूरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला वारकरी लाखोंच्या संख्येने पंढरपूरला जातात. मध्यरेल्वेने नागपूर, अमरावती, कोल्हापूर, भुसावळ, लातूर, मिरज अशा सर्वच विभागातून पंढरपूरला जाण्यासाठी विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत, या पार्श्वभूमीवर कोकणातील वारकऱ्यांसाठी १ ते १० जुलै या कालावधीत सावंतवाडी-पंढरपूर विशेष गाडी चालवावी, अशा मागणीचे निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वेबोर्डाला दिले आहे. कोकणातूनही वारकरी बहुसंख्येने आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जातात. रेल्वे प्रशासनाने आजवर एकदाही सावंतवाडीतून पंढरपूरला जाणारी रेल्वेगाडी सोडलेली नाही. कोकणातून पंढरपूर रस्तेमार्गे जवळ असले तरी घाटमाथ्यावरील प्रवासामुळे प्रवासास विलंब होऊन कंटाळवाणा प्रवास करण्याची वेळ ओढवते. रेल्वेने प्रवास आरामदायी होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर १ ते १० जुलै या कालावधीत सावंतवाडी-पंढरपूर मार्गावर विशेष गाडी चालवून वारकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आर्जव महापदी यांनी रेल्वेबोर्डाकडे दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
------------

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.