आपल्याकडे सकाळी उठल्यावर चहाबरोबर खारी, बटर खाण्याची जणू परंपराच आहे. कारण अनेकजणांकडे दिवसाची सुरुवातच ही या पदार्थांच्या सेवनापासून होते. त्यामुळे घरातील मोठेच मोठ्या चवीने चहात खारी , टोस्ट किंवा बटर बुडवून खात असल्याचे बघतच लहान मुलं मोठी होतात. नंतर त्यांच अनुकरण करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की मैद्यापासून बनवण्यात येणाऱ्या या पदार्थांमध्ये अशा काही रसायनांचा वापर करण्यात येतो ज्यामुळे कॅन्सरबरोबरच हृदयविकारांचा धोका कैकपटीने वाढतो. यामुळे खारी, टोस्ट बटर खाणे म्हणजे कॅन्सर आणि हृदयविकारालाच आमंत्रण देणं असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
तज्ज्ञांनुसार मैद्यापासून तयार करण्यात येणाऱे हे पदार्थ म्हणजे भाजलेले पावचं असतात. तसेच ते कुरकुरीत व दिर्घकाळ फ्रेश राहावेत यासाठी त्यात हायड्रोजेनेटेड ऑईल, सिंथेटीक शुगर आणि अनेक प्रकारच्या रसायनांचाही वापर करण्यात आलेला असतो. विशेष म्हणजे या पदार्थ नावालाही कोणताही पौष्टीक किंवा आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल असा गुण नसतो. उलट यात भरपूर कॅलरीज आणि कार्ब्स असतात. यामुळे दिवसाची सुरुवात जेव्हा चहा आणि हे पदार्थाने तुम्ही करता तेव्हा पोटातील अॅसिड वाढते. अॅसिडीटी होते.पोट फुगते. पोटात गॅस तयार होतो. तसेच यात वापरण्यात आलेल्या रसायनांमुळे शरीरातील इतर अवयवांवरही त्याचा दुष्परिणाम होतो.
यात वापरण्यात य़ेणाऱ्या हाइड्रोजेनेटेड तेलात कृत्रिम चरबी भरपूर असते. त्यामुळे रक्तात कॉलेस्ट्रॉल वाढते. हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका वाढतो. तसेच यातील इतर रसायनांमुळेही कॅन्सर होण्याची शक्यताही वाढते.