माळेगाव - 'माळेगावपासून आम्ही बाजूला गेलो आणि राष्ट्रवादी सत्तेत आली तेव्हा कारखान्यावर ११८ कोटींचे कर्ज होते. त्याउलट साखरेसह उपपदार्थ प्रकल्पामधील उत्पन्न १२४ कोटी रुपयांचे शिल्लक होते. वास्तविक ही कर्जाची आकडेवारी खरी, परंतू हे सत्ताधारी मंडळी सव्वाचारशे कोटींचे कर्ज आमच्या काळात होते असे खोटे सांगतात.
त्यामुळे कर्ज, उत्पन्न, साखर विक्री आदी वादग्रस्त ठरलेल्या बाबींवर समोरासमोर बसण्याची तयारी आमची आहे. कळू द्या सभासदांना द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी, ` असे थेट आव्हान सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे प्रमुख चंद्रराव तावरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.
माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना निवडणूक चिन्ह वाटप झाल्यानंतर आज प्रचाराची खरी रणधुमाळी सुरू झाली. नीरावागज येथे सहकार बचाव शेतकरी पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. त्या प्रसंगी ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे बोलत होते.
डिस्टलरीवर १०० कोटी कर्ज काढले, ऐच्छिक ठेवींचा सदुपयोग झाला नाही, नवीन गोडाऊन गळतीमुळे ६० हजार पोती भिजली, टिपल टेबल लाखो रुपये खर्च करून बदलावा लागला, ३६३६ ऊस दर देताना इतर देणी मागे ठेवली आदी अक्षेपार्य़ मुद्यांवर तावरे यांनी यावेळी प्रहार केला. ते म्हणाले,' आम्ही सत्तेत असताना केवळ ३३ कोटींच्या ठेवी होत्या.
याच ऐच्छिक ठेवी आता ९३ कोटींवर गेल्या. तसेच १८ कोटींचे शेअर्स भांडवल वाढले, असे असताना त्या रकमेचा विनियोग चांगला झाला नाही. सिव्हील विभागात बोगस व वाढील बिले काढली. हे होत असताना कोणाचा कोणावर अंकूश राहिला नव्हता. त्यामुळे नेत्यांना स्वतःची उमेदवारी जाहीर करावी लागली.` 'माळेगाव हा शेतकर्यांच्या मालकीचा कारखाना आहे.
सत्ताधाऱ्यांच्या पॅनेलमध्ये व्यापारी, उद्योजक उमेदवार आहेत. त्यांना शेतकऱ्यांची काय दुखणी असतात हे समजाणार नाही. त्यांनी अधिकारी, कर्मचारी, कामगारांना प्रचारात गुंतविले आहे. दमकाटीला घाबरू नका, ही निवडणूक आपल्या प्रपंचाची आहे. पाहुणा आला तरी त्याचे स्वागत चांगले करा, परंतु कारखान्याचा विषय काढला की त्यांना गोडीत सांगा आमच्या प्रपंचात लक्ष घावू नका.` असे तावरे यांनी उपस्थितांना सांगितले.
तत्पुर्वी रंजन तावरे म्हणाले, `माळेगावची शिक्षण संस्था पवारांच्या विद्या प्रतिष्ठानला जोडायची आहे. माळेगाव ऐवढा ऊस बाजार इतर खाजगी कारखान्यांना द्यावा लागतो, हे थांबविण्यासाठी अजित पवार माळेगावच्या संचालक मंडळात येण्यासाठी उत्सूक आहेत. त्यांना थांबविण्यासाठी येणाऱ्या निवडणूकीत सभासदांनी निर्णायक भूमिका घेतली पाहिजे.
त्यामध्ये महिलांनीही या निवडणूकीत प्रपंच डोळ्यासमोर ठेवून मतदान करावे,` असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उमेदवार राजेश देवकाते, विठ्ठल देवकाते, रोहन कोकरे, धनुभाऊ गवारे, रोहित जगताप, उत्तम तावरे आदींनी मनोगते व्यक्त केली.