सेक्टर चाळीस, स्वच्छतागृह मात्र एक
esakal June 14, 2025 10:45 PM

खारघर, ता. १४ (बातमीदार) : निसर्गरम्य आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर वसाहतीत आवश्यक त्या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने शहरातील नागरिक, कामगार व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकूण ४० सेक्टर असणाऱ्या खारघर नोडमध्ये केवळ एकच सार्वजनिक स्वच्छतागृह असल्याने विशेषतः महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
सिडकोने अठराशे हेक्टर जमिनीवर विकसित केलेल्या खारघर नोडमध्ये एकूण ४० सेक्टरचा समावेश असून लोकसंख्या पाच लाखांच्या घरात आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या खारघरमध्ये पांडवकडा धबधबा, गोल्फ कोर्स, सेन्ट्रल पार्क, मेट्रो, इस्कॉन मंदिर, ग्रामविकास भवन, स्कायवॉक, शिल्प चौक, उत्सव चौक, प्रशस्त रस्ते आहेत. शिवाय, ४० शाळा आणि १० महाविद्यालये आहेत. मॉल्स, तसेच विविध बँकांनी आपले जाळे पसरले. अशा सोयीसुविधांयुक्त शहरात सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणीकडे सिडकोने दुर्लक्ष केले आहे. पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यानंतर लोकप्रतिनिधी स्वच्छतागृहांची समस्या मार्गी लावतील, असे वाटत होते; मात्र लोकप्रतिनिधींनीदेखील याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
---------------------------
लोकसंख्या भरमसाट; सुविधा शून्य
सिडकोने खारघर सेक्टर १४ येथील स्मशानभूमीशेजारी केवळ एक स्वच्छतागृह उभारले आहे. खारघरच्या वाढत्या विकासामुळे लोकसंख्येत भर पडत असल्यामुळे फळ, भाजी बाजार, बसथांबा आदी महत्त्वाच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे. विशेष म्हणजे, खारघर सेक्टर ३० ते ४० या परिसरात जवळपास एक लाख नागरिक वास्तव्य करीत आहे. या भागात एकही उद्यान, मैदान विकसित केले नसल्यामुळे ई-टॉयलेट आणि सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आवश्यकता असेल अशा ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारावे, अशी मागणी महिलांकडून केली जात आहे.
------------------
वर्दळीचे बसथांबे स्वच्छतागृहाविना
खारघर वसाहतीत एनएमएमटी आणि बेस्टच्या बस सुरू आहेत. जलवायू विहार, घरकुल, नवरंग सर्कल, बँक ऑफ इंडिया, केंद्रीय विहार, रघुनाथ विहार, सेन्ट्रल पार्क, टाटा हॉस्पिटल, भारती विद्यापीठ-बेलपाडागाव असे जवळपास १५हून अधिक वर्दळीचे बसथांबे आहेत; मात्र एकाही ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय नाही.
--------------------
महिलांना स्वच्छ व सुरक्षित शौचालयांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विविध शारीरिक व मानसिक आजारांना सामोरे जावे लागते. लघवी रोखून धरल्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. लघवी रोखून ठेवणे ही सवय असल्यास मूत्रपिंडाला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांची गरज आहे.
- डॉ. मनीषा मतकर, स्त्रीरोगतज्ज्ञ
--------------
पालिका अस्तित्वात आल्यानंतर काही उद्यानात ई-टॉयलेट उभारले आहे; मात्र त्यात पुरेसे प्रमाणात पाणी नाही. त्यामुळे खरेदीसाठी बाजारात येणाऱ्या महिलांची कुचंबणा होत असून आरोग्यावर परिणाम होत आहे. पालिका प्रशासनाने खारघर वसाहतीमधील वर्दळीचे बसथांबे, भाजीपाला बाजार आदी ठिकाणी स्वच्छतागृह उभारणे आवश्यक आहे.
- राजश्री कदम, महिला अध्यक्ष, शरद पवार गट, खारघर
------------------
खारघर परिसरातील काही मुख्य वर्दळीच्या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून स्वच्छतागृह उभारण्याचा मानस आहे. पुढील सहा महिन्यांत आवश्यकता असलेल्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाईल.
- वैभव विधाते, उपायुक्त, पनवेल महापालिका

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.