ज्यांची मुलं प्राथमिक शाळेत आहेत किंवा माध्यमिक शाळेत आहेत, त्यांना थोड्या वेगळ्या प्रकारची तयारी करावी लागते. म्हणजे विशेषत: ‘दीर्घ सुटीनंतरची शाळेची तयारी’. या पालकांमध्ये ‘एकच मूल’ असणारे पालक आणि ‘दोन मुलं’ असणारे पालक असे दोन भिन्न गट असतात.
पहिल्या गटातील खूपसे पालक हे अतिकाळजीवाहू, संवेदनशील आणि मुलांच्या प्रगतीविषयी दक्ष व तहानलेले असतात. परिसरातील इतर मुलांच्या तुलनेत आपलं मूल मागे तर पडत नाही ना, याबाबत त्यांचा सतत शोध सुरू असतो. दुसऱ्या गटातील खूपसे पालक अनुभवी असल्याने काहीसे बिनधास्त असतात; पण यामुळे आपल्याच दोन मुलांत तुलना करण्याचा धोका इथे असू शकतो.
या अशा परिस्थितीत शाळेची तयारी समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला मुलांची मानसिकता समजून घ्यायला हवी. गेला महिनाभर मुलं हुंदडत आहेत. अभ्यास करण्यासाठी वाचन, लेखन, एका जागी चार तास बसणं, गृहपाठ, क्लासचा अभ्यास हे सारं मुलं विसरूनच गेली आहेत. शक्यता आहे, की या गोष्टींबाबत मुलं फारसं चांगलं बोलणार नाहीत.
त्यावेळी त्यांच्यावर रागावू नका. पटत नसलं तरी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या. मुख्य म्हणजे त्या क्षणी मुलाला, ‘अभ्यासाचं महत्त्व आणि त्याचं उज्ज्वल भविष्य किंवा जीवनातील अभ्यासाचं महत्त्वपूर्ण स्थान’ याबद्दल काहीही सांगू नका. कारण हे तुमचे मौलिक विचार ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच तो नाही.
तो यावेळी तुम्ही जे बोलता त्याच्या नेमकं उलटं बोलण्याची शक्यता अधिक असते... पण लक्षात घ्या, तो हे मनापासून बोलत नसतो, तर मनात साचलेल्या रागाला, संतापाला तो मोकळी वाट करून देत असतो. कोंडलेल्या रागाचा निचरा होणं ही त्याची त्यावेळची गरज असते. त्यातूनच तो नकळत स्वत:ला रिफ्रेश करत असतो.
पालकांनी आपलं मन मोठं करून हे समजून घेतलं पाहिजे; पण अशा वेळी पालकांनी उपदेशाचे फवारे मारले, तर राग विझण्याऐवजी तो आत कोंडला जातो आणि मुलं धुसफुसत राहतात.,पालक आणि मुलं यांचा सुटीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णत: भिन्न असू शकतो. त्यामुळे अशा घरात चक्रीवादळं होतात. मुलांना वाटतं, ‘सुटी म्हणजे धमाल, मजा, मुख्य म्हणजे रटाळ अभ्यासापासून सुटका.’
अनेक पालकांना सुटी म्हणजे डोकेदुखीच वाटते. दिवसभर धमाल, धागडधिंगा करणारी आनंदी मुलं पाहिली, की त्यांना अर्धशिशी सुरू होते.
शाळा सुरू होण्याच्या सुमारास अशा पालकांच्या खवचट दृष्टिकोनाची सावली त्यांच्या बोलण्यातून जाणवू लागते. उदाहरणार्थ, ‘बरं झालं, शाळा सुरू झाली. आता सुटी विसरा आणि अभ्यासाला लागा. चांगले दिवे लावलेत तुम्ही सुटीत..’ अशी मुक्ताफळं ऐकल्यावर कुठला मुलगा आनंदानं शाळेत जाईल आणि मन लावून अभ्यास करेल?
पालक आणि मुलं यांच्यात दरी निर्माण होण्यास मुख्यत्वे कारणीभूत असणाऱ्या दोन मूलभूत गोष्टी म्हणजे, पालक मुलांशी बोलण्यासाठी (किंवा त्यांना सुनावण्यासाठी) वापरतात ती भाषा; आणि दुसरी म्हणजे पालकांची देहबोली. शाळेसाठी तयारी करताना आपल्याला या दोन गोष्टींपासूनच तयारी करावी लागणार आहे.
मुलांशी बोलताना मूल समजून घेण्याची, त्याची मानसिकता जाणून घेण्याची तळमळ असेल, तर मग आपोआपच बोलणं सकारात्मक होतं आणि देहबोली आश्वासक होते. लक्षात घ्या, आपल्याला मुलांना शाळेत पाठवायचं नसून, त्यांना शाळेत जाण्यासाठी तयार करायचं आहे. शाळेसाठी मुलांप्रमाणेच आपल्यालाही तयारी करायची आहे आणि म्हणूनच सुटीबाबतचे आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून मुलाशी सुटीसंदर्भात सहज गप्पा मारणं आणि या गप्पांतूनच त्याला अलगद शाळेकडे नेणं.
‘सुट्टीतला रेंगाळणारा आनंद मुलांना शाळेत जाण्याची ऊर्जा देतो’ ही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा.