आळंदी, ता. १४ : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी महावितरण चोवीस तास अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी सज्ज आहे. रविवार (ता. १५) ते शुक्रवार (ता. २०) पर्यंत चोवीस तास कर्मचारी सेवा देणार असून त्यासाठी सात नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. आत्पत्कालीन परिस्थितीत काही अडचण उद्भवल्यास शहराचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी दोन स्वतंत्र उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जाणार आहे.
आषाढ वारीच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या तयारीसंदर्भात माहिती देताना सहाय्यक अभियंता संदीप पाटील म्हणाले, ‘‘संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान गुरुवारी (ता. १९) रात्री आठच्या दरम्यान असणार आहे. यावेळी देऊळवाड्यात मुख्य प्रस्थानाचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर देऊळवाड्यासह, महाद्वार, इंद्रायणी काठी, प्रदक्षिणा रस्ता पालिका चौक या भागात गर्दी असते. रात्रीच्यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी महावितरणकडून चोवीस तास वीजपुरवठा सुरळीत ठेवला जाणार आहे. याचबरोबर स्वतंत्रपणे तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सात नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. मंदिर आणि परिसरासाठी दोन रोहित्रावरून वीजपुरवठा केला जाणार आहे. तसेच मंदिरासाठी जादा क्षमतेचे रोहित्र बसविले आहे. यात्रा कालावधीत एखाद्या रोहित्रामध्ये बिघाड झाल्यास त्यासाठी जादाचे रोहित्रही महाविरतरणकडे उपलब्ध आहे. प्रदक्षिणा मार्गावर वीज वाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत.
रहदारीस अडथळा ठरणारे पोल हटविले
याचबरोबर शहरामध्ये मंदिर परिसर, घुंडरे गल्ली, चाकण रस्ता, देहू फाटा या भागातील रहदारीस अडथळा ठरणारे सर्व विद्युत पोल कर्मचाऱ्यांनी काढून टाकले आहेत. तसेच वीजवाहक ताराही नव्याने बसविल्या आहेत. वीज वाहिन्यांची संपूर्ण देखभाल दुरुस्ती पूर्ण झाली आहे.
अशा आहेत सुविधा
- तीस अधिकारी आणि कर्मचारी वारी काळात चोवीस तास उपलब्ध
- नियंत्रण कक्षाचे विविध भाग करण्यात आले आहेत
- यात्रा नियोजन फिरते पथक, मुख्य कार्यालय वीजभार तपासणी कक्ष, विविध फिडरची देखभाल, मंदिरातील वीज पुरवठा तक्रारींबाबत निवारण असे विभाग
- मरकळ रस्ता, जलाराम मंदिर, दत्त मंदिर परिसरासाठी स्वतंत्र कक्ष
- नगरपालिका येथेही स्वतंत्र नियंत्रण कक्ष
- इंद्रायणी पार्क वडगाव रस्ता, पद्मावती रस्ता भागासाठी वीज तक्रार निवारण कक्ष
- चाकण चौक, गोपाळपुरा या भागासाठी तक्रार निवारण केंद्र