'गजालीं'ची बोली!
esakal June 15, 2025 08:45 AM

डॉ. महेश केळुसकर -saptrang@esakal.com

‘मालवणी’ला त्या मुलखातल्या मातीचा रंग-गंध आहे, एक गावरान बाज आणि गोडी आहे. काही वेळेला मासळीचा सगळा ‘हिंगुसपणा’ नाहीसा करणाऱ्या तिरफळांचा तोंडभर मिरमिरणारा तिखटपणाही आहे!

‘चल चेडवा पडावात्सुन

आगबोटीर जपान ।।धृ।।

शिमिटाच्या चाळीत घोव तुजो ऱ्हवता

हडपलो दिसभर खपान

गिर्नितली चाकरी, हटेलातला खाना

उरताला कसा घोपान? ।।१।।

(उत्कंठा व इतर कविता-

पृ. ७९- वि. कृ. नेरूरकर)

ही वि. कृ. नेरूरकरांच्या भावगीतातली मालवणी कन्या (चेडू) बहुतेक वेंगुर्ला किंवा देवगडहून मुंबईला नवऱ्याकडे चाललीय! आगबोटीतून जाणाऱ्या या आपल्या मुलीला तिची आई मायेने काही सूचना देतेय. ती म्हणतेय, ‘‘माझ्या मुली, पडावातून आगबोटीवर चढताना जरा जपून चढ. तिकडे मुंबईला सिमेंटच्या चाळीत राहणारा तुझा गिरणी कामगार नवरा दिवसभर राबून आणि हॉटेलातलं खाऊन अगदी रोडावलाय. अशा परिस्थितीत त्याला कशी ताकद उरेल?’’ गीताच्या पुढच्या कडव्यांत नेरूरकरांनी मालवणी बोली आणि समाज संस्कृतीची वैशिष्ट्ये सांगणारा भावभावनांचा खेळ रंगवला आहे.

१८९३ मध्ये आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन्मलेले आणि १९२५ ते १९४० या काळात सावंतवाडीच्या राजघराण्याचे ‘ट्यूटर’ म्हणून काम केलेले वि. कृ. नेरूरकर हे मालवणीतील पहिले कवी मानले जातात. १९३४ मध्ये वेळगावच्या महाराष्ट्र मंडळाच्या नवरात्रीत त्यांनी ‘मराठी भाषा व कोकणी बोली’ या विषयावर व्याख्यान दिले. त्या व्याख्यानानंतर ४-५ दिवसांनी शहापूर इथे काव्यगायनाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले ‘हिज मास्टर्स व्हॉईस’ (एचएमव्ही) कंपनीचे प्रतिनिधी बाबूराव चावरे यांनी मालवणी गाणी लिहिण्याचा आग्रह नेरूरकरांना केला. अशी चार मालवणी गाणी १९३४ च्या दरम्यान ‘एचएमव्ही’ने रेकॉर्ड केली आणि ती घराघरांत ग्रामोफोनवर बाजू लागली. नेरूरकरांची आणि मालवणीची लोकप्रियता शिगेला पोहोचली. ‘वस्त्रहरण’ची लोकप्रियता ही अलिकडच्या काळातली. पण मालवणीचा पहिला झेंडा फडकवला नेरूरकरांनी, हा इतिहास.

उत्तरेस विजयदुर्ग खाडीपासून दक्षिणेस किरणपाणी नदीपर्यंत पसरलेला ५,२०७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा सिंधुदुर्ग जिल्हा वर्तमानकाळात ‘मालवणी मुलूख’ म्हणून ओळखला जातो. प्रचलित लोकरूढीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, दोडामार्ग, सावंतवाडी, देवगड व वैभववाडी या ८ तालुक्यांमध्ये बोलल्या जाणाऱ्या बोलीला ‘मालवणी’ असा संबोध आहे. (‘रात्रीस खेळ चाले’ किंवा ‘गाव गाता गजाली’ यांसारख्या टीव्ही मालिकांमधून कृत्रिम हेल काढून जी बोलली जाते ती खरी मालवणी नव्हे!)

मालवणी बोलीच्या अभ्यासक विद्या प्रभू यांनी मालवणी आणि संस्कृतचे ऋणानुबंध तिच्या जन्मापासून असल्याचं म्हटलं आहे. ‘घोव’ (नवरा) या शब्दाचा उगम संस्कृत- ‘धन’ (पती) या शब्दात आहे. सधवा, विधवा या शब्दांची उत्पत्तीही अशीच झाली आहे. ‘अगे माजे धुये’ (मुली), म्हणून मालवणी ग्रामीण स्त्री आपल्या मुलीला प्रेमाने मिठी मारते. पण ही ‘धू’ आली कुठून? संस्कृत धातू ‘दुट्ट’चा अर्थ ‘दूध काढणे’ असा आहे. जुन्या काळात गाईचे दूध काढण्याचे काम घरच्या मुलीकडे असे. त्यामुळे ‘दुट्ट’ण्याची क्रिया करणारी ती ‘दुहिता’ आणि पुढे अपभ्रंशाने ‘धू’ झाली. ‘तुया’, ‘मिया’, ‘तेणे’ (तेनी) व ‘जेनी’ ही सर्वनाम रूपे, अनुक्रमे ‘त्वया’, ‘मया’, ‘तेन’ (त्याने) व ‘येन’ (ज्याने) या संस्कृत सर्वनामांपासून आल्याचे स्पष्ट दिसते. ‘हय’, ‘धय’, ‘खय’, ‘जय’- अनुक्रमे ‘येथे’, ‘तेथे’, ‘कोठे’, ‘जेथे’ हीसुद्धा संस्कृतवरून आल्याचे दिसते.

मुलगी चौदा-पंधरा वर्षांची झाली, की पूर्वीच्या काळात मालवणी मुलखात तिच्यासाठी वरसंशोधनाला सुरूवात व्हायची. ‘धू आता व्हकाल झाली, लगीन करूक व्हया,’ असे संवाद त्या घरात व्हायचे. ‘व्हकाल’मध्ये संस्कृत शब्द ‘वृषली’ असा असावा. कारण ‘वृषली’चा अर्थ चौदा-पंधरा वर्षांची अविवाहित मुलगी असा आहे. ‘वृषली’मधील ‘वृ’चा ‘व’ (व्ह) आणि ‘ष’चा ‘ख’ (क) होऊन ‘व्हकली’ शब्द झाला व त्याचीच पुढे ‘व्हकाल’ झाली, अशी उपपत्ती विद्या प्रभू यांनी मांडली आहे. संस्कृतचा प्रभाव असलेले काही आणखी मालवणी शब्द पुढीलप्रमाणे आहेत. १) भात उपता (पेरतो)- ‘उपणे’मध्ये संस्कृत धातू ‘वेप्- वपति’ (पेरणे) आहे. २)‘तरवा’ (भाताची रोपे)- ‘तरु’चे (झाड) बहुवचन. ३) ‘कातरनी’ (भात कापणी)- ‘कर्त’न (कापणे), ४) ‘कामेरी’ (मजूर)- ‘कर्मकर’, ५) ‘बाव’ (विहीर)- ‘वापी’.

मालवणी बोली म्हणी आणि वाक्प्रचारांनी श्रीमंत असलेली संवादभाषा आहे. मुलखातल्या खेड्यापाड्यात आजही शेतकऱ्यांच्या, कामकऱ्यांच्या घरीदारी आणि बाजारहाटात बोलता-बोलता मालवणी स्त्री-पुरूष एखादी म्हण सणकन बोलून जातात आणि आपले म्हणणे समोरच्याला सोदाहरण पटवून देतात. जीवनानुभवाच्या मुशीत तयार झालेल्या, निखळ सौंदर्यानं नटलेल्या या मार्मिक मालवणी लोकोक्ती आजही मालवणी बोलीचे वैभव आहेत. त्यांना मालवणी मातीचा रंग-गंध आहे, गावरान गोडवा आहे आणि काही वेळेला मासळीचा सगळा ‘हिंगुसपणा’ (उग्र दर्प) नाहीसा करणाऱ्या तिरफळांचा तोंडभर मिरमिरणारा तिखटपणाही आहे!

‘सोलवणी भात आणि मध्यान रात, कोंबो आसल्यार उजवाडात,’ ही अशीच एक मासलेवाईक मालवणी म्हण. ‘सोलवणी’ म्हणजे सोलकढी अर्थात कोकम कढी- अगदी कमी वेळात होणारे, लोकांचे आवडते कालवण. पण कामाचा उरक नसलेल्या बाईला सोलकढी आणि भात असे साधेसोपे जेवण रांधायलाही मध्यरात्र होते. मग कोंबडी-वड्याचे ‘भारी’ जेवण असेल तर विचारायलाच नको. तिला स्वयंपाक आवरायला रात्र संपून नक्कीच दुसरा दिवस उजाडेल, अशी म्हण. आळशीपणाची खिल्ली उडवणारी ही तिरकस मालवणी लोकोक्ती कोकणात ‘फेमस’ आहे. मालवणी बोलीतील आणखी लोकोक्ती आणि सौदर्यस्थळांबद्दल माहिती घेऊया, पुढील अंकात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.