जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर चालवले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची तळ नष्ट करण्यात आली. त्यानंतर संतापलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. परंतु भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीमुळे पाकिस्तानचे सर्व हल्ले निकामी झाले. भारताकडून सपाटून मार खाल्यानंतर पाकिस्तान आपलाच विजय झाल्याचा दावा करत आहे. पाकिस्तानने तीन राफेलसह पाच लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे. परंतु त्याचे कोणतेही पुरावे दिले नाही. आता राफेल बनवणारी कंपनी डसॉल्टने पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड केला आहे.
डसॉल्ट पाकिस्तानचा दावा फेटाळला आहे. फ्रान्सची विमान निर्माण कंपनी डसॉल्ट अॅव्हिएशनचे सीईओ एरिक ट्रापी यांनी पाकिस्तानचा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानचा दावा चुकीचा आणि आणि निराधार आहे. एरिक ट्रापी यांचे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा येत्या काही दिवसांत पॅरिस एअर शो होणार आहे. या एअर शोमध्ये जगभरात आधुनिक लढाऊ विमानांच्या क्षमतेबद्दल चर्चा होत आहे.
एका फ्रेंच मासिकाशी बोलताना एरिक ट्रापी म्हणाले, भारतीय राफेल विमान पाडल्याच्या बातम्या खोट्या आहेत. आमचा राफेलच्या क्षमतेवर आणि युद्धात त्याच्या टिकाऊपणावर पूर्ण विश्वास आहे. राफेल हे बहुउद्देशीय विमान आहे. हे हवेतून हवेत युद्ध, जमिनीवर हल्ले, गुप्तहेर मिशन, अण्वस्त्र वाहून नेणारे विमान आहे. राफेलच्या F-22 सारख्या विमानांशी स्पर्धा करण्यात काही मर्यादा असू शकतात. परंतु F-35 च्या तुलनेत राफेल अधिक चांगले आहे. राफेल हे चीनच्या सध्याच्या लढाऊ विमानांपेक्षा खूपच सक्षम आहे. पाकिस्तान ते पाडू शकत नाही.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी ब्लूमबर्ग टीव्हीला एक मुलाखत दिली होती. त्यात दावा केला होता की, पाकिस्तानने भारताचे पाच लढाऊ विमाने पाडली. त्यात तीन राफेल आहे. तसेच भारतीय सैनिकांनाही बंदी बनवले आहे. परंतु त्यांच्या या दाव्याचे कोणतेही पुरावे दिले नाही. आता फ्रान्समधील डसॉल्ट कंपनीनेही पाकिस्तानचा दावा फेटाळला आहे.