अहमदाबाद विमान दुर्घटनेत २७४ जणांचा मृत्यू झाला. यात विमानातील प्रवाशी आणि क्रू मेंबर्ससह २४१ जणांचा समावेश आहे. तर ३३ जण विमान ज्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झालं त्या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी आणि डॉक्टर आहेत. दरम्यान, या विमान दुर्घटनेमागं षडयंत्र असल्याची शंका योगगुरु बाबा रामदेव यांनी व्यक्त केली होती. विमानाच्या मेंटेनन्सचं काम करणाऱ्या तुर्कितील कंपनीवर रामदेव बाबा यांनी संशय व्यक्त केला होता. आता तुर्किच्या कंपनीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अहमदाबादमध्ये जे विमान दुर्घटनाग्रस्त झालं त्याच्या मेंटनन्सचे काम आमच्या देशातली कंपनी करत नाही असं तुर्कीने स्पष्ट केलंय. तुर्की टेक्निक कंपनीनं अपघातग्रस्त विमानाच्या मेंटेनन्सचं काम केल्याचा दावा चुकीचा असल्याचं कंपनीने सांगितलं.
सोशल मीडियावरून तुर्कितील कंपनीने म्हटलं की, आमच्या कंपनीकडून या विमानाच्या मेंटनन्सचं काम केलं जातं होतं असं म्हणणं हे दोन्ही देशातील संबंधाबाबत संभ्रम निर्माण करण्यासारखं आहे. २०२४ आणि २०२५ मध्ये एअर इंडिया आणि टर्किश टेक्निक यांच्यात झालेल्या करारानुसार विमानांच्या मेंटेनन्सची सेवा दिली जाते. पण दुर्घटना झालेलं बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर हे या करारात येत नाही. आजपर्यंत टर्किश टेक्निकने अशा प्रकारच्या एअर इंडियाच्या कोणत्याही विमानाचा मेंटनन्स केलेला नाही.
दुर्घटना झालेल्या विमानाची देखभाल दुरुस्ती कोण करायचं हे आम्हाला माहितीय. पण त्याबाबत आम्ही काही बोलणं योग्य नाहीय. यामुळे आणखी संभ्रम निर्माण होईल. पण जे खोटं पसरवलं जात आहे त्याला उत्तर देण्याची सिस्टिम आहे. खोटं पसरवणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील. तुर्कीचे लोक भारतात झालेल्या या घटनेमुळे दु:खी असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे.