BMC Election: महानगरपालिका निवडणुकीसाठी शरद पवारांचा पक्ष सज्ज, 'मिशन मुंबई' घेतले हाती!
esakal June 16, 2025 04:45 AM

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष सज्ज झाला असून त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त घाटकोपर येथे संकल्प शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात याबाबतचा सुतोवाच करण्यात आला.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे एकदिवसीय शिबिर घाटकोपर येथे संपन्न झाले. या शिबिराला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, पक्षाची विभागणी झाली. मात्र मुंबईच्या कार्यकर्त्यांनी पवार साहेबांची साथ सोडली नाही.

लोकांची सहानभूती आणि विश्वास ही पक्षाची खरी ताकद आहे, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. पारदर्शीपणे आणि निष्ठेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे लोकं नक्कीच उभे राहतात. त्यामुळे आपल्या वॉर्डमध्ये कसून तयारीला लागा, असे आदेशही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले.

त लवकरच बैठका घेऊन प्रत्येक प्रभागाचा आढावा घेतला जाईल. तिथल्या कार्यकर्त्याशी बोलून त्यांचे म्हणणे आणि सूचना लक्षात घेतल्या जातील.त्यांच्या अडचणी सोडवल्या जातील. इतकेच नाही तर प्रत्येक प्रभागात पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जाणार असून नवीन समित्या स्थापन केल्या जातील.

याचप्रमाणे नवीन कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यासाठी प्रत्येक प्रभागात कार्यकर्ता शिबिर आयोजित केले जातील. यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती केली जाणार असून त्यांचे मार्गदर्शन शिबिर ठेवले जाईल, असे ही जयंत पाटील यांनी सांगितले.

मुंबईतील समस्यांकडे लक्ष

यावेळी जयंत पाटील यांनी मुंबईतील वेगवेगळ्या समस्यांना हात घातला. महानगरपालिकेच्या मुदत ठेवी झपाट्याने खाली येत आहेत. पैसे तर कमी होतोय पण शहरात नेमकी काय नवीन उभं राहतेय हा प्रश्न आहे. मुंबईत रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत, वाहतूक कोंडी होते, पाणी साचते, पिण्याच्या पाण्याची समस्या आहेच. मग हजारो कोटी रुपये जातात कुठे? असा सवाल ही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

भाजपला जशास तसे उत्तर द्यायला सज्ज व्हा!

मुंबई आपल्याला सहजासहजी मिळालेली नाही. आज मुंबईला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप त्यांनी केला. पेटंट कार्यालयाचं मुख्यालय मुंबईतून थेट दिल्लीला हलवलं जातंय. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राची कल्पना केंद्रात कॉंग्रेसप्रणित 'यूपीए' सरकार असताना मांडली गेली होती. त्यासाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भूखंड राखून ठेवला होता.

मात्र हे केंद्र देखील रातोरात हलवलं. २६/११ चा हल्ला झाल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने नॅशनल मरीन पोलिस अकॅडेमी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स केंद्र स्थापन करण्याचे ठरवले, मात्र आता ते गुजरात मध्ये नेले. मुंबईचा हिरेबाजार गुजरातला नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक प्रकारे मुंबईची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे भाजपला जशास तसे उत्तर द्यायला सज्ज व्हा असे आवाहन ही त्यांनी केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.