श्रीमंतांची आर्थिक समस्या !
esakal June 16, 2025 09:45 AM

डॉ. वीरेंद्र ताटके - गुंतवणूक विषयाचे अभ्यासक

मंत लोकांना कसली आलीय आर्थिक समस्या! त्यातही अतिउच्च उत्पन्न गटातील व्यक्तींकडे (हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल) पैशांची मुबलकता एवढी असते, की त्यांना आयुष्यात कोणत्याही आर्थिक समस्येचा मुकाबला करावाच लागत नसणार,’ असा विचार बहुतेकांच्या डोक्यात असतो. परंतु, हा समज खोटा ठरवणारे एक सर्वेक्षण पुढे आले आहे.

मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स आणि डन अँड ब्रॅंडस्ट्रीट या संस्थांनी केलेल्या या सर्वेक्षणात भारतातील २८ शहरांमधील उच्च संपत्ती असलेल्या ४६५पेक्षा अधिक कुटुंबांचा समावेश होता. सर्वेक्षणात समावेश झालेल्या व्यक्तींचे वय तीस वर्षांपेक्षा अधिक होते आणि प्रत्येक कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न २० लाख रुपयांपेक्षा अधिक होते. काही कुटुंबांचे उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा अधिक होते. या सर्वेक्षणात पुढे आलेले काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत.

असमाधानकारक परतावा

भारतीय शेअर बाजाराने २०२० ते २४ या वर्षांमध्ये तेजी अनुभवली असली, तरी या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४० टक्के श्रीमंत व्यक्तींनी या कालावधीत त्यांच्या गुंतवणुकीवर समाधानकारक परतावा मिळाला नसल्याचे सांगितले; तसेच आपल्याला गुंतवणुकीतील वैविध्य (डायव्हर्सिफिकेशन) राखता आले नाही, असे त्यातील बहुतेकांनी मान्य केले.

आर्थिक शिस्त

अतिश्रीमंत असूनदेखील आपल्याला आर्थिक शिस्त नाही, असे ४३ टक्के व्यक्तींनी मान्य केले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ५० टक्के व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींनी त्यांच्यावर कर्जाचा बोजा असल्याचे मान्य केले.

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या अतिश्रीमंत कुटुंबांनी गुंतवणुकीसाठी रिअल इस्टेट या पर्यायाला सर्वाधिक प्राधान्य दिल्याचे समोर आले. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या अतिश्रीमंत लोकांची संख्या कमी आहे.

इमर्जन्सी फंड

आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या अतिश्रीमंत व्यक्तींपैकी १४ टक्के जणांनी अडचणीच्या वेळी उपयोगी पडेल, असा इमर्जन्सी फंड त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले.

गुंतवणूक सल्ला

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी त्यांच्या पैशांचे आणि गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

परिणाम

सर्वेक्षणात सहभागी श्रीमंत लोकांनी सांगितले, की त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत त्यांची बचत होत नाही. कुटुंबातील सदस्यांना आर्थिक शिस्त नाही, हे त्यामागील मुख्य कारण असल्याचे त्यांनी मान्य केले. याचा परिणाम म्हणजे अधिक उत्पन्न असले, तरी त्या तुलनेत त्यांची बचत होत नसल्याने नोकरी-व्यवसायातून लवकर निवृत्ती घेणे, मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवणे यांसारख्या इच्छांना मुरड घालावी लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निष्कर्ष

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या अतिउच्च श्रीमंत कुटुंबांची संख्या ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास पुरेशी नसली, तरी पुढे आलेल्या माहितीवरून असे लक्षात येते, की उत्पन्न आणि आर्थिक नियोजन यांचा नेहमीच थेट संबंध असतो, असे नाही. आर्थिक शिस्तीचा अभाव असल्यास उच्च उत्पन्न गटातील लोकांनादेखील आर्थिक समस्यांचा मुकाबला करावा लागू शकतो. योग्य नियोजन नसेल, तर विविधतेचा अभाव, कर्जाचा बोजा, इमर्जन्सी फंडाचा अभाव आदी समस्या श्रीमंतांनाही भेडसावू शकतात. याउलट मर्यादित उत्पन्न असूनही आर्थिक शिस्त, बचतीची सवय आणि योग्य आर्थिक सल्ल्याच्या मदतीने आर्थिक उद्दिष्ट गाठणे शक्य होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.