इतिहास घडता घडता नवाच इतिहास घडला. जो घडायचा तो राहोन गेला. नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असावे. नियती नावाची जी कोणी एक बया आहे, ती बोलते एक, करते एक आणि वागते तिसरेच. महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित टाळीप्रयोगापूर्वीच सन्नाटा पसरला. टाळी हुकणार, अशी चिन्हे निर्माण झाली. तोवर राज्यभर दोघा बंधूंच्या मनोमीलनाची होर्डिंगे लागली होती. कुणीतरी आपल्याला टाळी द्यायला येते आहे, या कल्पनेनेच बांदऱ्यात फटाके फुटू लागले होते. तेवढ्यात बारा वाजले. आय मीन, घड्याळात बारा वाजले…
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा संकल्प सोडोन मोहीमशीर जाहलेल्या शिवाजी पार्कच्या राजियांनी एक दिवस निवडक विश्वासू पाईकांसमवेत (पक्षी : गाडीचा चालक वगैरे) थेट बांदऱ्याकडे मोर्चा वळवला. ‘शिवतीर्था’ वरोन गाड्या निघाल्या; परंतु, निघता निघताच राजियांनी रथ थांबवोन पत्रकारांस (हे उभेच असतात!) सांगितले की, आम्ही ‘मातोश्री’वर निघालो आहोत. पत्रकारांस काय करावे हे कळेना! कुणीतरी समोर बसून हाती पेढा ठेवावा, तशी ब्रेकिंग न्यूज आपणहून देत होते. काय क्रावे? पण तेवढ्यात खुद्द राजेसाहेबच फिक्कन हंसले!
कशी गेली गंमत! या अर्थाचे. पत्रकारही कसनुसे हंसले! इतिहास घडता घडता राहिला…. या फजितवाडा समर प्रसंगानंतर ‘शिवतीर्था’च्या पायथ्याशी वेढा घालून बसलेली पत्रकारांची शिबंदी बेसावध झाली. राजेसाहेब हुलकावण्या देवोन कुठे तरी जाऊन (एकटे एकटे) बटाटेवडा, मिसळ वगैरे खाऊन येतात, ऐसा त्यांचा समज झाला. कुणास थांगपत्ता लागला नाही. त्याचा गैरफायदा घेवोन गतसप्ताहात एके दिशी सकाळीच उठून राजेसाहेबांच्या गाड्या निघाल्या. येवढ्या सकाळी एकतर साहेब उठत नाहीत, याचा अर्थ गाडी पेट्रोल भरायास पंपावर गेली असणार, अशी पत्रकार शिबंदीची अटकळ झाली. परंतु, गाड्या भर्रदिशी बांदऱ्याकडेच निघाल्या…इतिहास घडणार हे अटळ होते!
तथापि, बांदऱ्याच्या सिग्नलवर उजवी घेण्याऐवजी साहेबांची गाडी डावीकडे वळली, आणि थेट समुद्रकाठावर वसलेल्या ‘लँड्स एण्ड’दुर्गावर गेली. लँड्सएंडदुर्ग पंचतारांकित असला तरी तिथे बड्या राजामहाराजांसाठी मिसळ, मूगभजी अशी व्यंजनेही उपलब्ध होताती. लँड्सएण्डदुर्गावर अर्धा कलाक वेळ गेला असेल नसेल, तेवढ्यात आणखी एक गाड्यांचा ताफा लपत छपत दुर्गाच्या बुरुजांपल्याड गेला. त्यातील एका गाडीतून हुडीधारी व्यक्ती उतरली, आणि घाईघाईने अंतर्भागात अदृश्य झाली. हुडीधारी व्यक्तीने आजकाल कितीही वेषांतर केले तरी महाराष्ट्र त्यांस लांबूनच वळखतो. ते दुसरे तिसरे कोणीही नसून महाराष्ट्राचे अत्यंत यशस्वी कारभारी नानासाहेब फडणवीस हेच होते.
इतिहास घडणार, हे तर आता अटळ होते…लँड्सएण्डदुर्गाच्या एकविसाव्या मजल्यावरील २१०२ क्रमांकाच्या दालनात ही गोपनीय भेट पार पडली. या भेटीच्या वेळी दालनांच्या भिंतींव्यतिरिक्त कोणीही उपस्थित नव्हते, पण तरीही भेटीची इत्थंभूत खबर भांडुपमध्ये बसल्या बसल्या संजयाजी राऊत यांना लागली. या माणसापासून भारतातील कुठलीही गोष्ट लपून राहात नाही, हे अगदीच खरे आहे. या कानाचे त्या कानाला कळू शकत नाही, अशी खबरही त्यांस कानोकानी लागते.
मराठी माणसाची उरलीसुरली मुंबई कुणाला विकायची, या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती त्यांना लागल्याचे समजते. बाकी कुणालाच हा तपशील २१०२ क्रमांकाच्या दालनाच्या भिंतींनी कळू दिला नाही. भिंतींचे हे वागणे गैर आहे, असे पत्रकारांना वाटले. तथापि, या भेटीत नानासाहेबांनी माननीय राजेसाहेबांना आगामी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याची आमची माहिती आहे. कां की, खुद्द ‘बड्डे’ला याने की रविवारी साहेब मुंबईबाहेर जाणार असल्याची सर्वांत आधी खबर नानासाहेबांनाच लागली होती. इतिहास घडता घडता राहिला, तो असा!