शिरीष देशपांडे - सीए व सायबर गुन्हेविषयक अभ्यासक
सध्या कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची आणि पालकांची धावपळ सुरू आहे. विद्यार्थी आणि पालक उत्तम नावाजलेल्या संस्थेत प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न करत असतात. याचाच गैरफायदा सायबर चोरटे घेत आहेत. अनेक नावाजलेल्या शिक्षणसंस्थांच्या बनावट वेबसाईट तयार करून, लाखो रुपयांना गंडा घालत आहेत. नुकत्याच पुण्यातील एका नामांकित संस्थेच्या नावाने एमबीएसाठी खात्रीने प्रवेश मिळवून देतो, असे सांगून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली. मात्र, पोलिसांनी कसून तपास करून या प्रकरणातील आरोपींना पकडले आहे.
सायबर चोरटे अधिकृत नावात साम्य असलेल्या बनावट वेबसाईट अगदी बेमालूमपणे बनवतात. प्रथमदर्शनी त्यातील फरक मुळीच लक्षात येत नाही. समाज माध्यमांवर ग्रुप करून त्यात आकर्षक जाहिराती, सवलतींचा वर्षाव करून विद्यार्थी आणि पालकांकडून लाखो रुपये उकळले जात आहेत. प्रसिद्ध संस्थांची हुबेहूब लेटरहेड वापरून प्रवेशपरीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे ई-मेल किंवा पत्राद्वारे कळवले जाते. काही सायबर चोरटे ‘हमखास प्रवेश मिळवण्यासाठी मार्गदर्शन’ अशा खोट्या वेबसाईट चालवत आहेत. नावाजलेल्या संस्थांच्या नावाने खोटे फोनही केले जात असून, विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढले जात आहे. हे सर्व प्रकार लक्षात घेऊन शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ किंवा अन्य शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
अशी घ्या काळजी...आपण प्रवेश घेत असलेल्या संस्थेची पूर्ण खातरजमा करावी. ती संस्था विद्यापीठ अनुदान आयोग किंवा अन्य आवश्यक त्या नियमाक संस्थांशी संलग्न असल्याची खात्री करून घ्यावी.
कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर माहिती भरण्याआधी तो प्लॅटफॉर्म अधिकृत आहे, याची खात्री करावी.
मर्यादित जागा अशा जाहिराती बघून दडपण घेऊन घाईगडबडीत निर्णय घेऊ नये.
पैसे भरताना संस्थेच्या अधिकृत खात्यात भरावेत, मोठ्या रकमा आगाऊ भरू नयेत.
त्या संस्थेचे आणि विद्यार्थ्यांचे अभिप्राय बघावेत. विविध मार्गांनी संस्थेची माहिती जाणून घ्यावी.
शक्य असल्यास संबंधित संस्थेत समक्ष जाऊन यावे.
विद्यार्थ्यांनी घरातील मोठ्या व्यक्तींच्या सल्ल्यानेच प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी.
ताबडतोब या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी आणि १९३० या नंबरवर संपर्क साधावा. ही यंत्रणा ज्या खात्यात पैसे गेले आहेत, ती खाती गोठवण्याचे तातडीने प्रयत्न करते.