70889
70888
महामार्गावर कुरधुंड्यातील संरक्षण भिंतीला तडे
प्रवाशांसह ग्रामस्थांचे जीव धोक्यात; ग्रामपंचायतीचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १६ः बेजबाबदार ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा उत्तम नमुना संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा येथील मुंबई-गोवा महामार्गावर समोर आला आहे. येथे उभारलेल्या भल्यामोठ्या संरक्षण भिंतीला तडे गेले असून, ही भिंत कोणत्याही क्षणी कोसळण्याची श्यक्यता आहे. ही भिंत कोसळली तर मोठी दुर्घटना होऊन प्रवासी तसेच स्थानिक ग्रामस्थांचा जीव धोक्यात येण्याची भीती आहे. येथील ग्रामपंचायतीने या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून दाद मागितली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेले कित्येक वर्ष सुरू असून, निकृष्ट कामाची अनेक उदाहरणे यापूर्वी समोर आली आहेत. संगमेश्वरमध्ये प्रवासी व ग्रामस्थांना अत्यंत भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. आता कुरधुंडा येथे भितीदायक असा प्रकार समोर आला आहे. कुरधुंडा येथील हजरत इशामुद्दीन दर्गासमोर महामार्गाला सुमारे १०० मिटरहून अधिक लांबीची संरक्षण भिंत उभारली आहे. वर्षभरापूर्वी उभारलेल्या या संरक्षण भिंतीला भलेमोठे तडे गेले आहेत. एका बाजूने ही भिंत बाहेरच्या दिशेला सरकत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे ही भिंत कोणत्याही क्षणी कोसळण्याची श्यक्यता आहे. दुर्दैवाने, जर ही भिंत कोसळली तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. भिंतीच्या समोरच दर्गा असून, येथे रोज भाविक येत असतात. धोकादायक झालेल्या भिंतीला लागूनच राष्ट्रीय महामार्ग असून, या महामार्गावरून वाहनांची ये-जा सुरू आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, महामार्गांवरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. साहजिकच, या प्रशासन व ठेकेदार कंपनीने याची त्वरित दखल घेण्याची गरज आहे.
या संदर्भात कुरधुंडा ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली आहे. ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन संबंधित संरक्षण भिंतीची परिस्थिती तसेच उद्भवणारा धोका याकडे लक्ष वेधले आहे. तसेच या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची व संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच या धोकादायक बनलेल्या भिंतीवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
चौकट
पॉवरहाउसजवळील दोन घरात पाणी
संगमेश्वर येथील पॉवरहाउसजवळ असलेल्या मोरीमध्ये हायवेवरील मातीचा भराव टाकल्याने पावसाचे पाणी शेजारील दोन घरात घुसले. जयेंद्र दत्ताराम सुर्वे व राजेंद्र अनंत बिर्जे यांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले. संगमेश्वर सरपंच विवेक शेरे यांना बोलावून वस्तुस्थिती दाखवण्यात आली. त्यांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला. तरीही ठेकेदारांनी दुर्लक्ष केले. याबाबत ग्रामस्थांनी संगमेश्वर पोलिसांना कळवले आहे.