गोगावलेंवर वसंत मोरेंनी आरोप केले ते बगलामुखी माता मंदिरात होणारे यज्ञ काय असतात?
BBC Marathi June 17, 2025 06:45 AM
BBC

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी केलेल्या आरोपांमुळं पुन्हा एकदा राजकारणी आणि अंधश्रद्धा याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

शिंदे गटाचे आमदार आणि विद्यमान मंत्री भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पुजा केल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. बगलामुखी माता मंदिराचे पुजारी घरी आणून अघोरी पुजा केल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे.

याबाबत आम्ही अंधश्रद्धा निमुलन समितीकडे तक्रार करू. बाहेरच्या राज्यातून मांत्रिक आणून घरात पुजा घालणं किती योग्य आहे? असं मोरे म्हणाले. बगलामुखीला एका एका पुजेला 15 लाखांपर्यंत खर्च येतो असा दावाही मोरे यांनी केला.

तर गोगावले यांनी इतरांप्रमाणे बगलामुखी मातेच्या दर्शनाला गेलो होतो आणि इतरांसारखीच पुजा केली असं स्पष्ट केलं आहे. त्याठिकाणी अनेक लोक होम हवन करत होते, तसंच आम्हीही केलं, असं गोगावले यावेळी म्हणाले.

मोरेंनी आधी सांगितलं असतं तर त्यांनाही सोबत नेलं असतं, असं गोगावलेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

या आरोप प्रत्यारोपांच्या निमित्ताने बीबीसी मराठीने नोव्हेंबर 2023 मध्ये काही राज्यांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत बगलामुखी इथं जाऊन खास रिपोर्ट केला होता. तो याठिकाणी पुन्हा देत आहोत.

BBC

निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार आणि पक्ष वेगवेगळ्या प्रचार मोहिमा आखत असतात. मतदारांना खुश करण्याचे वेगवेगळे प्रयत्न सुरू असतात. वेगवेगळी आमिषंसुद्धा दाखवली जातात.

पण हे सर्व करत असताना अनेक उमेदवार निवडणूक जिंकण्यासाठी तंत्रमंत्रांचासुद्धा आधार घेताना दिसून येत आहेत.

अर्थात कोण निवडणुका जिंकणार हे फक्त आणि फक्त मतदारच ठरवू शकतात.

“प्रत्यक्षात यज्ञ आणि मंत्रतंत्राचा वापर करून काहाही साध्य होत नाही. माणूस त्याच्या पलिकडे जाऊन खूप पुढे पोहोचला आहे,” असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांचं म्हणणं आहे.

पण तरीही मध्य प्रदेशातल्या इंदूरपासून साधारण 170 किमी अंतरावर आगर जिल्ह्यातल्या नलखेडा नावाच्या छोट्या गावात राजकारणी आणि कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येतेय.

याच नलखेडामध्ये आहे तंत्रविद्येसाठी प्रसिद्ध असलेलं बगलामुखी माता मंदिर.

बगलामुखी मंदिराच्या परिसरात शिरताच तुम्हाला तूप आणि लाकडं जाळल्याचा वास यायला लागतो. मंदिराबाहेर गाड्या पार्किंगची जागा जवळपास फुल झालेली असते.

इथं वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या अलिशान गाड्या पाहायला मिळतात. पण तरीही मंदिराबाहेरच्या हार, फुलं आणि प्रसाद विकणाऱ्या खोटेखानी बाजारपेठेत अजिबात गर्दी नसते.

मंदिरातही दर्शनासाठी फारशी गर्दी दिसून येत नाही. मग आलेल्या गाड्यांमधील गर्दी कुठे गेली असेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर ही सर्व गर्दी मंदिराच्या मागे असलेल्या यज्ञशाळेत बसलेली दिसून येते.

या यज्ञशाळेत शिरताच तुम्हा कमालीची उष्णता जाणवते. बाहेर येणारा लाकडं आणि तूप जाळल्याचा वास इथं तीव्र होतो. इथं सांडलेली पिवळी मोहरी आणि इतर यज्ञ साहित्य पायाला टोचायला लागतं.

धुरामुळे डोळे झोंबायला लागतात आणि कानावार मोठ्या आवाजात पडत असतात ते तंत्रमंत्रांच्या उच्चारांचे ध्वनी.

BBC मंदिराबाहेर असलेली छोटेखानी बाजारपेठ

डोळे चोळताना समोर दिसतात ते 40 यज्ञकुडं आणि त्याच्या अवतीभोवती पिवळे कपडे घालून बसलेले यजमान आणि पंडित. या 40 यज्ञकुंडांपैकी बऱ्याच यज्ञकुडांमध्ये अग्नी प्रज्वलीत झालेला असतो. तर काही कुडांमध्ये मात्र धूर येत असतो. या सर्व यज्ञकुडांमध्ये पिवळी मोहरी, जव, नागरमोथ, फळं, नारळ, लाकूड आणि शुद्धतुपाची आहुती दिली जात असते.

तसं या यज्ञशाळेत वर्षाचे बाराही महिने गर्दी असते. पण देशात कुठेही निवडणुका लागल्या की इथल्या गर्दीत वाढ झालीच असं समझा. इथं यज्ञ संपन्न करणारे पंडितही ही गोष्ट मान्य करतात.

पण असं काय कारण आहे की इथं निवडणुकीच्या काळात यज्ञ करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होते?

त्याचं कारण आहे इथं होणारा ‘शत्रू विजय यज्ञ.’

BBC

हा यज्ञ करण्यासाठी देशाच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या लोकांची इथं गर्दी झालेली दिसून येते. मी जेव्हा या यज्ञशाळेत प्रवेश केला तेव्हा मला प्रामुख्याने दिसले ते तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधून आलेले लोक. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि इतर राज्यांमधून आलेले लोकही इथं दिसत होते.

निवडणुकीत विजय व्हावा किंवा निवडणुकीचं तिकीट मिळावं यासाठी अनेक उमेदवार इथं फेऱ्या मारत असतात. ज्यांना स्वतःला शक्य होत नाही ते त्यांच्या नातेवाईक किंवा कार्यकर्त्यांना इथं यज्ञ करण्यासाठी पाठवतात.

इथं थेट प्रतिस्पर्धी उमेदवाराचं नाव घेऊन त्याच्यावर आपला विजय व्हावा यासाठी संकल्प केला जातो. यज्ञ करताना प्रतिस्पर्धी उमेदवाराचं नाव घेऊन मंत्रतंत्र म्हटले जातात.

BBC

मध्य प्रदेशातल्या जबलपूर जिल्ह्यातल्या एका मतदारसंघातून 5 वेळा आमदार राहिलेल्या एका उमेदवारनं त्याच्या मुलाला या ठिकाणी यज्ञ करण्यासाठी पाठवलं होतं. त्याच्याबरोबर कार्यकर्त्यांच्या गोतावळासुद्धा होता. पिवळे कपडे घालून हा तरूण त्याच्या वडिलांच्या विजयासाठी इथं यज्ञ करत होता.

इथं यज्ञ केलेल्यापैंकी अनेकांनी याबाबत माझ्याशी बोलण्यास नकार दिला. तर काही मंडळी मात्र मोकळेपणाने बोलली.

मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यातून आलेले 75 वर्षांचे दूर्गाप्रसाद कोष्टी त्यापैकीच एक.

मसाल्यांचे व्यापारी असलेल्या दुर्गाप्रसाद यांचा मुलगा सध्या सागर-41 या मतदारसंघातून विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. त्यांचा मुलगा दीपक कोष्टी (वय 37) यांनी काँग्रेसकडून तिकीटासाठी प्रयत्न केले. पण तिकीट मिळालं नाही म्हणून मग अपक्ष अर्ज दाखल केला.

BBC दुर्गाप्रसाद कोष्टी

अर्ज दाखल करताचे दुर्गाप्रसाद त्यांच्या मुलगा दीपकला इथं शत्रू विजय यज्ञ करण्यासाठी घेऊन आले होते. त्यांच्या बरोबर त्यांचे काही कार्यकर्तेदेखील होते.

बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटलं. “मुलाच्या विजयासाठी आम्ही आता इथं यज्ञ केला. या यज्ञामुळे माझा मुलगा 101 टक्के विजयी होईल असा आम्हाला विश्वास आहे.”

BBC बगलामुखी मंदिर शत्रू विजय यज्ञ नेमका काय आहे?

हाच प्रश्न मी या मंदिराचे मुख्य पुजारी मनोहरलाल पंडा यांना विचारला. पंडा निवृत्त शिक्षक आहेत.

ते सांगतात, “बगलामुखी ही तांत्रिक देवी आहे. इथं तंत्र साधना केली जाते. पाडवांनी कौरवांवर विजय मिळवण्यासाठी इथं साधना केली होती. मंदिराच्या चारही बाजूंना स्मशान आहे. इथं वेळोवेळी राजकीय नेते, अभिनेते, उद्योगपती, अधिकारी आणि सामान्य लोक त्यांच्या शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी येत असतात. त्यासाठी ते हवन आणि अनुष्ठान करतात. या हवनात होणारे विधी तंत्र आणि मंत्र दोन्ही पद्धतीने होतात.”

“निवडणुका जाहीर होण्याच्या 2 महिन्यांआधीपासूनच इथं लोकांची गर्दी सुरू होते. तिकीट मिळवण्यासाठी लोकांची इथं मोठी गर्दी होते. त्यानंतर जिंकण्यासाठी इथं लोक गर्दी करतात. इथं 24 तास हवन सुरू असतात.”

BBC मुख्य पुजारी मनोहरलाल पंडा

अर्थात अनेक नेत्यांच्या इथल्या भेटी गुप्त असतात हे सुद्धा मनोहरलाल पंडा मान्य करतात. अनेकदा या भेटी रात्री उशीरा होतात. तसंच अनेक मंडळी यज्ञ शाळेच्या मागच्या दारातून येऊन यज्ञ संपन्न करून मागच्या दारानेच परत जात असल्याचं मलाही तिथं दिसून आलं.

इथं तंत्रमंत्राचे विधीसुद्धा केले जातात. त्याबाबत बोलताना पंडा सांगतात,

“मंदिराच्या चारही दिशांना स्मशान आहे. मंदिर स्वतःसुद्धा एक स्मशानक्षेत्रच आहे. त्यामुळे मंदिरपरिसरात लोकवस्ती नाही. नलखेडा गावसुद्धा इथून अर्धा किलोमीटर दूर आहे. तंत्र साधनेचे विधी रात्रीच्यावेळी स्मशानात केले जातात,” असं पंडा पुढे सांगतात.

आतापर्यंत 4 ते 5 राज्यांचे मुख्यमंत्री यंदा इथं येऊन गेल्याचं पंडा मान्य करतात.

BBC

सध्याच्या काळात दिवसाला पाच ते सात आमदार इथं येत आहे. तसंच छोट्यामोठ्या नेत्यांची आणि आमदारांची इथं एवढी गर्दी झालेली असते की त्याची आम्ही गणनाच करू शकत नाही, असं पंडा यांचा दावा आहे.

नवरात्रीच्या आधी अनिल अंबानी इथं येऊन यज्ञ करून गेलेत. दिवाळीनंतर त्यांचे मोठे भाऊ मुकेश अंबानी येणार आहेत, अशी माहिती पंडा यांनी दिली.

महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्यानं मुख्यमंत्री होण्यासाठी इथं सात दिवसांचं अनुष्ठान केल्याची चर्चा मंदिर परिसरात सुरू होती. पण कुणीही पंडितानं किंवा मंदिराच्या विश्वस्तांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. हे वृत्त खोटं असल्याचं एका विश्वस्तानं मला सांगितलं.

पण, महाराष्ट्रातूनही अनेक मंत्री आणि आमदार इथं येऊन गेल्याचं मनोहरलाल पंडा सांगतात.

BBC

न्यायाधीश, जिल्हाधिकारी आणि वेगवेगळे सरकारी अधिकारीसुद्धा इथं सतत येत असतात. त्यापैकीच एक आहेत उजैन विभागाचे आयकर इन्सपॅक्टेर संजय राम.

मुळचे बिहारचे असलेले संजय राम इथं सहकुटुंब यज्ञ आणि दर्शनासाठी आले होते. ते इथं आल्याचं लक्षात येताच मी त्यांना यज्ञाबाबत कॅमेरावर बोलणार का अशी विचारणा केली. तर तात्काळ तयार झाले.

पण तुम्ही केलाल यज्ञ तर शत्रू विजय यज्ञ होता, तुमच्यासारख्या अधिकाऱ्याला त्याची काय गरज पडली असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी म्हटलं,

“शत्रू फक्त आपल्या दुष्मनाला नाही बोलत. मनातल्या विकारालासुद्धा शत्रू बोललं जातं. मनातली हावसुद्धा शत्रूच असते. कुणाप्रती असलेली इर्शासुद्धा शत्रूच आहे. या सर्वांचा त्याग केल तर विजय मिळतोच. त्यासाठीच मी हा यज्ञ केला. कुटुंबाच्या सुखशांतीसाठी हवन केलं”

BBC यज्ञ सामुग्री

संजय राम यांनी आतापर्यंत 8 -10 वेळा इथं यज्ञ केला आहे.

तसंच् प्रोटोकॉलमुळे त्यांच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसुद्धा ते इथं अनेकवेळा घेऊन आले आहेत, असं ते सांगतात.

मनोहर वर्मा इंदूरमधले केबल ऑपरेटर आहेत. यज्ञ शाळेतून ते यज्ञ करून बाहेर पडताच मी त्यांना यज्ञाविषयी विचारलं तर कॅमेरावर बोलण्यास ते तयार तर झाले. पण त्यांनी खरं कारण मात्र सांगण्यास नकार दिला.

इथं येऊन तुम्ही शत्रू विजय यज्ञ केला का, असं विचारल्यावर ते सांगतात की, “मी कुटुंबाच्या शांतीसाठी यज्ञ केला.” इथं होणाऱ्या तंत्रविद्येबद्दल विचारलं तेव्हा मात्र त्यांनी त्याबाबत घडलेल्या घटना मी कॅमेरावर सांगू शकत नाही असं सांगितलं.

दक्षिणेकडेच्या राज्यातून आलेल्या मंडळीचीही इथं मोठी गर्दी होती. तेलंगणातल्या वारंगळमधून पुरुषांचा एक गट हा यज्ञ करण्यासाठी आल्याचं दिसून आलं. त्यापैकीच एक भास्कर राव यांना विचारलं तर त्यांनी कुटुंबाच्या शांतीसाठी यज्ञ केल्याचं सांगितलं.

BBC शाम मानव शत्रू विजय यज्ञामुळे खरंच निवडणुकीत विजय होतो?

हाच प्रश्न मी मनोहरलाल पंडा यांना विचारला ते सांगतात, “इथं कमलनाथ आणि शिवराजसिंह चौहान दोघे आले होते. पण अर्थात त्यांच्या दोघांपैकी एकच कुणीतरी मुख्यमंत्री होईल. त्यामुळे जो योग्य असेल त्यालाच हा यज्ञ पळेल”

तसंच कित्येकदा एकाच मतदारसंघातले दोन्ही उमेदवार इथं येऊन यज्ञ करातात पण, त्यापैकी योग्य माणसाचाच विजय होतो, असं पंडा सांगतात.

नेमका इथंच शक्यअशक्यतांचा नियम म्हणजेच लॉ ऑफ प्रोबॅबिलीटी लागू पडतो. अखिल भारत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव नेमकं त्यावरच बोट ठेवतात.

बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, “खरंतर इथं शक्यअशक्यतेचा नियम लागू होतो. एखाद्या मतदारसंघात 10 उमेदवार आहेत. समजा त्यांनी सर्वांनी यज्ञ केले तरी त्यातील एकच निवडून येणार आहे. सर्व उमेदवारांना देखील त्याची कल्पना असते. तरीही ते या पद्धतीचे यज्ञ आणि मंत्रतंत्र करतील करण त्या पद्धतीच्या समजुती या लहानपणापासून आपल्या मनावर बिंबलेल्या असतात. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की याचा फायदा फक्त त्यांनाच मिळेल. पण प्रत्यक्षात यज्ञ करून काहीही सध्य होत नाही. मंत्रतंत्रांच्या माध्यमातून काहीही साध्य होत नाही. ही वस्तुस्थिती आहे आपण त्याच्या पलिकडे जाऊन खूप पुढे पोहोचलो आहोत.”

BBC

हे पुढे आणखी स्पष्ट करण्यासाठी शाम मानव एक उदाहरण सांगतात, “700 वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज म्हणून गेले आहेत – मंत्रानं जर माणून मेला असता तर शूर पुरुषांनी त्यांच्या कमरेला कट्यार का बांधली असती आणि कट्यारीच्या माध्यमातूनच शत्रूचा निःपात केला असता.”

असं असलं तरी या यज्ञातून मात्र एक छोटी अर्थव्यवस्था आणि रोजगार आकाराला येत आहे.

अर्थकारण आणि रोजगार

सध्या देशातल्या 5 राज्यांमध्ये निवडणुका असल्याने इथल्या 40 यज्ञकुडांमध्ये 24 तास यज्ञ सुरू आहेत. प्रत्येक दीड तासाने यज्ञाच्या भोवती बसलेल्या पंडित आणि यजमानांमध्ये बदल झालेला दिसून येतो. इथं सध्या दिवसाला 450 पेक्षा जास्त यज्ञ होत आहेत.

एका यज्ञामध्ये साधारण 2 ते 4 पंडित सहभागी झालेले असतात. इथं यज्ञ करणारे साधारण 600 पंडित आहेत. तर 200 पंडित देवीच्या मंदिरामध्ये पूजाअर्चाचं काम पाहतात. म्हणजे एकूण सधारण 800 पंडितांना इथं रोजगार मिळालेला आहे.

शिवाय 7 दिवसांच्या अनुष्ठानाकरता किमान 5 पंडितांची गरज असते. त्यांना प्रत्येकी 5000 रुपये सात दिवसांचे द्यावे लागतात.

BBC ङाविक

यज्ञशाळेच्या खालच्या मजल्यावर अनुष्ठान केंद्र आहे. इथं वेगवेगळ्या खोल्यांमध्ये अनुष्ठान सुरू असतात. तिथल्या एका खोलीतील एका अनुष्ठानात सधारण 20 पेक्षा जास्त पंडित बसलेले आम्हाला दिसून आले.

“अनुष्ठान करण्यासाठी बराच खर्च येतो. त्यासाठी जास्त ब्राह्मणांची संख्या लागते. त्यामुळे साधारण 40 ते 50 हाजारांचा खर्च येतो. यज्ञ 3 ते 4 हाजारात सुद्धा होते. यज्ञाची सामग्रीसुद्धा यात समाविष्ट असते,” असं पंडा यांनी माहिती देताना सांगितलं.

म्हणजेच साधारण 10 ते 15 लाखांची उलाढाल इथं एका दिवसात होते. संपूर्ण निवडणुकीच्या काळात हा आकडा कोट्यवधींच्या घरात जातो.

नलखेडाला किती फायदा? BBC नलखेडा

नलखेडाची लोकसंख्या सधारण 15 हजारांच्या आसपास आहे. इथं नगर पंचायत गावाचा कारभार पाहाते. बगलामुखी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी इथं साधारण 8 ते 10 हॉटेल्स आहेत.

पण इथं येणाऱ्या अनेकांचा कल नलखेडामध्ये थांबण्याकडे नसतो. कारण इथून इंदूर, उज्जैन, आगर सारखी ठिकाणी जवळ आहेत. लोक राहण्यासाठी या शहरांना पसंती देतात. गुप्तता हेसुद्धा त्यामगचं एक कारण सांगता येऊ शकतं.

परिणामी गावाची अर्थव्यवस्था म्हणावं तशी जोर पकडू शकेलेली नाही. सतत व्हीव्हीआयपींची इथं वर्दळ असते, पण त्या तुलनेत इथं पायाभूत सुविधा नाहीत. मंदिराच्या समोर असलेल्या नाल्यात कचऱ्याचं साम्राज्य दिसून येतं. मंदिराच्या मागे असलेल्या नदीला पार करण्यासाठी असलेला पुल देखील जिर्ण झाला आहे.

मंदिर परिसरात मात्र थोडीफार विकासकामं झालेली दिसून येतात.

हेही नक्की वाचा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.