(निबंध लिहा : १० गुण)
मला शाळा खूप खूप आवडते. मी शाळेत रोज जातो. सुट्टी
पडली की मला शाळा आठवते, आणि शाळेत गेलो की सुट्टी
आठवते. आज माझ्या शाळेचा पहिला दिवस होता. शाळेत जाताना मी रडलो. मग आईने माझे बखोट पकडून शाळेत नेले. शाळेत जाताना मी कटकट करत होतो, तेव्हा आई बाबांकडे रागारागाने बघत होती. बाबा पेपर वाचत होते. आई कुणाला तरी बैल म्हणाली. बाबांनी अंग शहारल्यासारखे केले. मग मी हंसलो. हसत हसत शाळेत गेलो…
आमच्या शाळेत आज चांगले वातावरण होते. पाऊस खूप पडत होता, पण मुख्याध्यापक सर खूप टेन्शनमध्ये दिसत होते. त्यांना घाम फुटला होता. नामू शिपायासारखे ते दाराशीच घाबरुन उभे होते. तेवढ्यात जगातील सर्व मुख्याध्यापकांचे मुख्याध्यापक असलेले एक काका मोटारीतून आले. ते आम्हा मुलांच्या स्वागतासाठी आले होते. मुख्याध्यापक सर आम्हाला बघून भडकले. म्हणाले, ‘‘ लौकर कशाला आलात? मूर्ख!! आता लांब जा, आणि मी खूण केली की मग चालत या! पाहुण्यांनी तुमचं स्वागत कसं करायचं? गाढव!’’ आम्ही परत लांब गेलो…
‘विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सरकार’ या योजनेअंतर्गत अनेक मंत्रीकाका शाळाशाळांमध्ये मुलांचे स्वागत करणार आहेत, असे मला नामू शिपाई म्हणाला.
नामूदादाला सगळे माहीत असते. मुख्यमंत्रीकाका येणार म्हणून मुख्याध्यापक सर घाबरले आहेत, ही खबर त्यानेच दिली. भूगोलाच्या शिंपीसरांना मुलगी झाली याची बातमीही त्याने आम्हाला दिली. तेवढ्यात मुख्याध्यापकांनी खूण केली, म्हणून आम्ही शाळेच्या फाटकाशी आलो. तिथे मुख्यमंत्रीकाका हसत हसत उभे होते. त्यांना हसताना बघून नामू शिपाई माझ्या कानात कुजबुजला की, ‘ते असे हसले की डेंजर काम असतं! एकदा हसले की कुठला ना कुठला पक्ष फुटतो!!’’
मग मी काही हसलो नाही. मुख्यमंत्रीकाकांनी मुख्याध्यापकांकडून पुष्पगुच्छ घेतला आणि पाठीमागे उभ्या असलेल्या एका सफारीवाल्याकडे दिला. असा सफारी बाबांनी बबडमावशीच्या लग्नात शिवला होता. की हा, तोच असेल? या मुख्यमंत्रीकाकांना कोणी मुख्यमंत्री केले? असे मला वाटले. त्यांना साधी घंटा वाजवता आली नाही. नामू शिपाई कडक वाजवतो. यांनी उगीचच दोन-तीनदा टणटण आवाज केला. मी समोरच उभा होतो, म्हणून माझा गालगुच्चा घेतला. गालगुच्चा घेणाऱ्याचा मला राग येतो. एक गुच्चा ठेवून द्यावासा वाटतो. पण मी काही बोललो नाही. मुख्यमंत्रीकाकांनी एकाही मुलाला चाकलेट दिले नाही. मी वाट बघत होतो. पण त्यांनी खिशात हात घातलाच नाही. मग एवढे जाकिट शिवून काय उपयोग?
‘‘काका तुम्ही शाळेत जाता का?,’’ असा प्रश्न मी त्यांना विचारला. मी निरागस आहे. निरागस मुलाने काहीही विचारले तरी चालते.
‘‘अगदी शाळेत नाही, पण जवळ जवळ तसंच काहीसं असतं, तिथं जातो बाळा!,’’ मुख्यमंत्रीकाका हसून म्हणाले.
‘‘तुम्ही कितवीत आहात?,’’ माझा दुसरा निरागस प्रश्न. त्यावर सगळे मोठ्यांदा हसले. एक विव्हळण्याचा आवाज आला. तो माझाच होता. मुख्याध्यापकांनी माझ्या मागच्या बाजूला विशिष्ट ठिकाणी सणसणीत चिमटा घेतला होता. पण मी बधलो नाही.
‘‘काका, तुम्ही आता कुठला पक्ष फोडणार?’’ माझ्या या तिसऱ्या निरागस प्रश्नानंतर मात्र वातावरण अचानक बदलले. मुख्यमंत्रीकाकांनी कार्यक्रम आटोपला, आणि ते निघालेच. मुख्याध्यापकांनी मला जवळ बोलावून ‘वडलांना बोलाव’ असे फर्मावले. माझे बाबा बैल आहेत हे मी त्यांना कसे सांगू? असा गेला शाळेचा पहिला दिवस.