Ramdas Athawale : राज ठाकरेंची भूमिका दररोज बदलते, त्यांना महायुतीत घेऊन फायदा नाही; रामदास आठवलेंचा रोखठोक निशाणा
Saam TV June 17, 2025 04:45 AM

विजय पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

राज ठाकरे यांची भूमिका दररोज बदलते, त्यांना महायुतीमध्ये घेऊन काही फायदा होणार नाही असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सांगलीच्या जतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला रामदास आठवले यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

'लोकसभेला राज ठाकरे आमच्यासोबत (महायुती) होते. पण त्यांचा काही फायदा झाला नाही. विधानसभेच्या निवडणूकांच्या वेळी ते आमच्यासोबत नव्हते. त्या वेळेस आम्हाला अधिक जागा मिळाल्या. त्यांची भूमिका रोज बदलणारी आहे. सोबत आल्याने महायुतीला काही फायदा होणार नाही', असे म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

'पाऊस बघून छत्री घेण्यापेक्षा रेनकोट घेतलेले कधीही बरं. काँग्रेसची छती घेतल्याने डोक शाबूत राहील, पण अंग भिजेल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने एनडीएचे रेनकोट घ्यावे', असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. ते सांगलीच्या जतमध्ये बोलत होते.

मागील काही दिवसांपासून राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंमध्ये युती होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याचे म्हटले जात होते. पण या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची ताज हॉटेलमध्ये भेट घेतली. ही भेट तासभर चालली. या भेटीदरम्यान काय घडले हे गुलदस्त्यात असले, तरी या भेटीचा परिणाम ठाकरे बंधूंच्या युतीवर होईल असे म्हटले जात होते. फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे महायुतीची वाट धरणार असल्याचे म्हटले जात होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.