खंडाळा : सातारा- पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटातील एस आकाराच्या वळणावर झालेल्या अपघातात भरधाव येणाऱ्या ट्रकने पुढे चाललेल्या तीन वाहनांना उडविले. यामध्ये दोन पिकअप, एक मोटार व मालट्रकचे मोठे नुकसान झाले. यामध्ये चार जण किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त दुचाकीस्वार घटनास्थळावरून निघून गेल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास खंबाटकी बोगदा ओलंडल्यानंतर बलकवडी कॅनॉलजवळील वळणावर ट्रकच्या वेगावर चालकाचे नियंत्रण न राहिल्याने पुढे चाललेला पिकअपला (एमएच ११ एचयू ४६३९) उडविल्याने उलटले. त्यानंतर मोटारीला (एमएच ९ जीएफ ५९६८) ट्रकने धडक दिली, तर पुढे या घटनेची माहिती देणारा अभिजित गजानन माळी (रा. सावळज, ता. तासगाव, जि. सांगली) यांच्या पिकअपला (एमएच १० डीटी ७५२५) ट्रकने ठोकरल्याने पलटी झाली.
असे तीन वाहनांना धडक देऊन ट्रक (एमएच ०५ एएम ३८७७) पलटी झाला. या अपघातात वाहने पलटी झाल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, ट्रकचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेची नोंद खंडाळा पोलिस ठाण्यात झाली असून, तपास हवालदार दत्ता दिघे करत आहे.