Satej Patil vs Dhananjay Mahadik : ‘राजकारणात कालचक्र असते. २०१९ मध्ये माझा निवडणुकीत घात केला. अमलचा पराभव झाला. गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती बँक येथेही पराभव झाला. पण, आम्ही कधी एकटे पडलो नाही. आम्ही लोकांची कामे करत होतो. त्यामुळे लोक आमच्याशी जोडले गेले. पराभव झाला म्हणून घरातला टीव्ही फोडला नाही. गाव सोडून गेलो नाही,’ अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांच्या विरोधकांना टोला लगावला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘तुमचा पराभव झाल्यावर तुम्ही एकटे पडलात का?’, या प्रश्नावर धनंजय महाडिक म्हणाले, ‘आज मावळलेला दिवस उद्या उगवत असतो. २०१९ साली घात करून मला निवडणुकीत पाडले. अमल महाडिक, झाला. गोकुळ आणि जिल्हा मध्यवर्ती बँक येथेही पराभव झाला. पण, आम्ही खचलो नाही. आम्ही एकटे पडलो असे कधी म्हटले नाही. लोकांची कामे करत गेलो. त्यामुळे लोक आमच्यासोबत राहिले. त्यानंतर मी खासदार झालो. अमल महाडिक आमदार झाले. गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष झाला.’
‘गोकुळ’च्या घडामोडींवर ते म्हणाले, ‘मी या सर्व घडामोडीत कुठेच नव्हतो. महायुतीचा अध्यक्ष झाल्यावर मी विधान केले होते. महायुतीचा अध्यक्ष झाला याचा आनंद आहे. पण, माझा या घडामोडींशी कोणताही संबंध नाही. आता पुढच्या वर्षी गोकुळची निवडणूक आहे. त्यादृष्टीने सत्ताधारी, विरोधक सर्वच जण प्रचार करत आहेत. गाठीभेटी घेत आहेत.’
जिल्ह्यातील भाजपमधील पक्षप्रवेशाबाबत खासदार महाडिक म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षात येण्यासाठी जिल्ह्यात अनेकजण इच्छुक आहेत. पण, आमच्या पक्षात महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत गेल्यावेळी विजयी झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. महापालिकेत आमचे ३४ नगरसेवक होते. त्यामुळे मूळच्या कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना नाराज न करता पक्षप्रवेश होतील.’
शतप्रतिशत भाजप
महापालिका निवडणुकीत ताराराणी आघाडी असणार का? यावर खासदार महाडिक म्हणाले, ‘आवश्यकता असल्यास ताराराणी आघाडी ठेवू. मात्र, आम्ही शतप्रतिशत भाजप म्हणूनच निवडणूक लढणार आहोत.’