इस्रायल आणि इराणमध्ये सुरु झालेल्या युद्धादरम्यान इराणमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने मंगळवारी आपल्या नागरिकांना महत्त्वाच अपील केलय. तेहरानमध्ये राहणारे भारतीय नागरिक आणि सार्वजनिक सूचना अधिकारी (PIO) यांना शहराबाहेर जाण्याचा सल्ला दिला आहे. जे लोक स्वत: शहराबाहेर सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतात, त्यांनी निघून जावं, असं तेहरानमधील भारतीय दूतावासाने म्हटलय. तेहरानमधील जे भारतीय संपर्कात नाहीयत, त्यांना सुद्धा दूतावासाने आवाहन केलय. जे भारतीय अजूनपर्यंत आमच्याशी संपर्क साधू शकलेले नाहीत, त्यांनी तात्काळ संपर्क करावा, असं भारतीय दूतावासाने आवाहन केलय. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार, इराणमध्ये 10 हजार 765 नागरिक राहतात.
तेहरानमधील भारतीय विद्यार्थ्यांना दूतावासाने सुरक्षाकारणास्तव शहराबाहेर काढलं आहे. जे भारतीय नागरिक ट्रान्सपोर्टच्या बाबतीत आत्मनिर्भर आहेत, त्यांना शहराबाहेर जाण्याचा सल्ला दिला आहे. काही भारतीयांना आर्मेनियाच्या माध्यमातून इराणच्या सीमेबाहेर पडण्याची सुविधा दिली आहे. लोकांना शक्य ती सर्व मदत करण्यासाठी दूतावास नागरिकांच्या संपर्कात आहे.
भारतीयांसाठी हेल्पलाइन नंबर काय?
दूतावासाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलय की, जे भारतीय नागरिक तेहरानमध्ये आहेत आणि दूतावासाच्या संपर्कात नाहीयत, त्यांना विनंती आहे की, त्यांनी तात्काळ तेहरानमधील दूतावासाशी संपर्क साधावा. आपलं लोकेशन व संपर्क नंबर कळवावा. या सोबतच दूतावासाने हेल्पलाइन नंबर शेअर केलाय. +989010144557; +989128109115; +989128109109
दोन्ही देशांत कंट्रोल रुम
त्याशिवाय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयसवाल म्हणाले की, इस्रायल आणि इराण दोन्ही ठिकाणी 24×7 कंट्रोल रूम स्थापित करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर दूतावासाने तेहरान सोडण्याच भारतीय नागरिकांना आवाहन केलय. दूतावासाने भारतीय नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्टपणे सांगितलय की, “अयातुल्ला खामेनेई यांच्या हत्येनंतर दोन्ही देशांमध्ये सुरु असलेलं युद्ध अजून वाढणार नाही, तर समाप्त होईल”
तणाव कमी होण्याचे कुठलेही संकेत नाहीत
इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने सुद्धा प्रत्युत्तर दिलं. सध्या दोन्ही देशांमध्ये वार पलटवार सुरु आहेत. मंगळवारी दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा पाचवा दिवस आहे. पण तणाव कमी होण्याचे कुठलेही संकेत मिळत नाहीयत.