Maharashtra Live News Update : पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी पातळी वाढली
Saam TV June 17, 2025 05:45 PM
Maharashtra Live News Update : पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी पातळी वाढली

पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस

पुण्याला पाणी देणाऱ्या धरणातील पाणी पातळी वाढली

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चार धरणे मिळून ९ टक्क्याने पाणी पातळीत वाढ

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा

खडकवासला: ५६.२२ टक्के

पानशेत: १६.८१ टक्के

वरसगाव: २५.३४ टक्के

टेमघर: ३.४३ टक्के

चार धरणे मिळून एकूण पाणीसाठा: २१.५३ टक्के

मागील वर्षी (आजच्या तारखेला) चार धरणे मिळून एकूण पाणीसाठा: १२.०१ टक्के

रायगडमधील आंबा आणि कुंडलीका नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

० रायगड जिल्ह्यातुन वाहणाऱ्या आंबा आणि कुंडलीका नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

० रोहा परिसरात खाडीला मिळणाऱ्या आंबा आणि कुंडलीका या दोन्ही नद्या इशारा पातळी इतक्या पातळीवरून वाहत आहेत

० रायगड जिल्ह्यातुन वाहणाऱ्या सवित्री, पाताळ, उल्हास आणि गाढी या मोठ्या नद्या इशारा पातळी खालून वाहत आहेत

० जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट असून पाऊस कमी अधीक प्रमाणात बरसत आहे

मांजरा धरण साठ्यात वाढ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाच वातावरण

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा मध्यम प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गतवर्षीच्या उन्हाळ्यात १८ टक्क्यांवर गेलेले पाणी आता २८ टक्क्यांपर्यंत आले आहे. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसासोबतच पावसाळ्यातही पाऊस होत असल्याने धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ होताना दिसून येत आहे... यामुळे शेतकऱ्यांतून देखील समाधान व्यक्त होत आहे.

लातूर शहर, एमआयडीसी, कळंब व अंबाजोगाई या मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातील अनेक खेड्यांना धनेगाव येथील मांजरा मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो.. तर लातूर ,बीड, धाराशिव या तीन जिल्ह्यांची जलदायिनी म्हणून मांजरा धरणाची ओळख आहे... दरम्यान पावसाळ्याच्या सुरुवातीलाच धरण क्षेत्रातल्या पाणीसाठ्यात वाढ होत, असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे..

जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी सहा तहसीलदारांना बजावल्या नोटिसा

जालन्यात शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि गारपीटीची नुकसान भरपाई म्हणून मंजूर झालेल्या अनुदान वाटपात बनावट शेतकरी दाखवून 26 तलाठी 5 ग्रामसेवक आणि 5 कृषीसहायकांनी तब्बल 40 कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे . दरम्यान या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील सध्याचे आणि बदली करून गेलेल्या अशा सहा तहसीलदारांना नोटिसा बजावल्या असून खुलासे मागितले आहेत.तर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून, महसूल सहायक आणि क्लर्क यांना देखील नोटिसा बजावून खुलासे मागितले आहे.त्यामुळ अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यामध्ये तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्यानंतर सहा तहसीलदारांसह तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे..

संभाजीनगरात तिघांवर चाकूहल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या खंडाळा येथे गुरुवारी तिघांवर चाकूहल्ला झाला होता. यानंतर एका टोळक्याने दुकानांचे शटर आणि घराचा दरवाजा तोडून साहित्याची नासधूस करत दुचाकी पेटवून दिली. या गंभीर घटनेनंतर भाजप आमदार संजय केणेकर यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिल्यानंतर याप्रकरणी रात्री वैजापूर पोलिसांत ३७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात अजूनहीआमदार संजय केणेकर यांनी सोमवारी दुकान आणि घरांची पाहणी केली. चाकूहल्ल्यातील संशयित आरोपी गौरव अनर्थे गोरक्षक आहे. त्याने गोरक्षणाचे स्टेटस ठेवल्यामुळे त्याला ५० जणांनी मारहाण केली. बचावावेळी ही घटना झाल्याचे केणेकर यांनी सांगितले. घटनेला मूळ कारणीभूत असलेल्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या हल्ल्यामुळे नवनाथ पत्नी आणि मुलांना घेऊन घराच्या मागील दरवाजाने निघून गेले. टोळक्याने दरवाजा तोडून घर आणि दुकानातील फर्निचर पेटवून देत जिवे मारण्याची धमकी दिली, तसेच जमावाने विजय त्रिभुवन यांच्या पाण्याच्या मशीन आणि टाक्या फोडल्या. गौरव अनर्थे यांची दुकान फोडून दुचाकी पेटवून दिली. जमावाने तिघांचे दुकान आणि दुचाकी पेटवून सात लाखांचे नुकसान केले.

आदिवासी पट्ट्यातील घाटघर येथील फडके बंधारा ओव्हरफ्लो

हिरव्यागार निसर्गाच्या कुशीतल्या या बंधाऱ्यातून पाणी ओसंडून वाहू लागल्याने या भागातील आदिवासी शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटणार असुन पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतीच्या दृष्टिकोनातून मोठा दिलासा मिळालाय यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याचबरोबर परिसरातील निसर्गसौंदर्य खुलल्याने आणि धबधबे, हिरवाई फुलल्याने पर्यटकही या भागाकडे आकर्षित होत आहेत. सध्या घाटघर परिसरात पर्यटकांची गर्दी होत असून, स्थानिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.

पंढरपुरात चंद्रभागा नदीवर समांतर पुल उभारण्यात येणार; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती

मावळ येथील पुल दुर्घटनेनंतर पंढरपूरच्या चंद्रभागेच्या नदीवरील जुन्या ब्रिटिश कालीन पुलाचा मुद्दा समोर आला आहे.

येथील जूना दगडी पुल हा धोकादायक असून या ठिकाणची जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. येथे नवीन पुल उभारणीसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. पुढच्या वर्षभरात येथे नवीन समांतर उभा राहिल . सोलापूर जिल्ह्यातील सर्व ब्रिटिश कालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

त्रिशूलने केला पारुच्या बछड्याचा गेम

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात तथा लगतच्या बफर क्षेत्रात वाघांची संख्या वाढली आहे. परिणामी त्यांच्यात अधिवास तथा मादीकरिता संघर्षही शिगेला पोहचला आहे. अशाच एका संघर्षात एका नवतरुण वाघाचा मृत्यू झाला. वाघिणीवर वर्चस्व गाजवण्यासाठी तिच्या मुलाला ठार करण्यात आले. याच कारणावरून मागील महिन्यात ताडोबाचा किंग छोटा मटका व ब्रम्हा नावाच्या वाघाची झुंज झाली आणि त्यात ब्रम्हाचा मृत्यू झाला होता. तर आता ताज्या घटनेत चिमूर बिटातील नर वाघ त्रिशुल व पारू वाघिणीचा बछडा यांच्यात झुंज झाली. त्यात बछड्याचा मृत्यू झाला. चिमूर वनपरिक्षेत्राअतंर्गत येत असलेल्या शेडेगाव परिसरात पारू नावाची वाघीण आपल्या नऊ महिन्याच्या बछड्यासोबत वास्तव्यास आहे. इथे येऊन त्रिशुलने पारूच्या मुलावर हल्ला चढवला. ताकदवर त्रिशूलपुढे नऊ महिन्यांच्या नवयुवक वाघाचा निभाव लागू शकला नाही. आणि तो यात मारला गेला. बछड्याचे तोंड पूर्णपणे फुटल्या अवस्थेत तथा पाय व मानेला जखमा दिसून आल्या.

मुंबई गोवा महामार्गावर पीर लोटे येथे उड्डाण पुलावर तडे

मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ठ कामाचा आणखी एक नमुना समोर आलाय कळंबणी पाठोपाठ पीर लोटे येथे देखील पुलावर रस्त्याला तडा गेल्या आहेत.लोटे औद्योगिक वसाहत ते परशुराम घाट भागात पीर लोटे येथे असणा-या उड्डाण पुलावर रस्त्याला ही मोठी तडा गेलीय परशुराम घाटाच्या सुरुवातीला, गोव्याकडे जाणाऱ्या बाजूच्या पुलाता तडा गेल्या महामार्गाच्या कामाबद्दल पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उभं राहतय.

मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड

सातार्यात ३२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे.मसाप, शाहूपुरी शाखा,मावळा फौंडेशन यांच्या मागणीनुसार साताऱ्यात संमेलन होणार आहे.मराठ्यांची चौथी राजधानी साताऱ्यात तब्बल 32 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. राजधानी साताऱ्यात होणाऱ्या या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

साताऱ्यात मसाप, शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशन या संस्थांनी मागणी केल्यानुसार साताऱ्यात हे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या दोन्ही संस्थांची संयुक्त बैठक नुकतीच झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी होते.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव सुचवले त्याला साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, साहित्यिक डॉ. उमेश करंबेळकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित असलेल्या दोन्ही संस्थांच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची एकमताने ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.