Pune Health Alert : उकळून घेतलेल्या पाण्याने टाळा जलजन्य आजार; पावसाळ्यामुळे वाढताहेत कॉलरा, अतिसार, टायफॉइडचे रुग्ण
esakal June 18, 2025 07:45 PM

पुणे : शहरात पावसाळ्यामुळे कॉलरा, अतिसार (डायरिया), टायफॉइड व काविळीचे रुग्ण वाढले आहेत. सोबतच उघड्या जखमेतून शरीरात प्रवेश करणाऱ्या लेप्टोस्पायरोसिससारख्या जिवाणूजन्य आजारांनी पुन्हा डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना शुद्ध व उकळून थंड केलेले पाणी पिण्यासाठी वापरण्याचा सल्ला दिला आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून शहरातील महापालिकेची दवाखाने, रुग्णालयांमध्ये तसेच खासगी रुग्णालयांमध्ये या आजारांमुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

विशेषतः बांधकाम सूरू असलेली ठिकाणे, पाणी साठून राहणारे सखल भाग, झोपडपट्ट्या व वस्त्यांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. शुद्ध पाणी न मिळणे, साचलेले पाणी व साफसफाईचा अभाव ही या वाढत्या रुग्णसंख्येमागची प्रमुख कारणे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सार्वजनिक ठिकाणी बाहेरचे व उघड्यावरील अन्न खाऊ नये. आजाराची लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी केले आहे.

काय आहेत लक्षणे?

पावसाळ्यात पाणीस्त्रोत गढूळ होतात. त्याला योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण न केल्यास व ते पाणी पिल्यास किंवा उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ल्यास त्यापासून कॉलरा, अतिसार, उलटी, मळमळ, जुलाब ही लक्षणे दिसून येत आहेत.

पावसाच्या साचलेल्या पाण्याचा संपर्क आल्याने लेप्टोस्पायरोसिसची लागण होण्याचा धोकाही बळावला आहे.

लेप्टोस्पायरोसिसचे जिवाणू असलेल्या पाण्यातून उघड्या जखमेद्वारे चालल्यास ते मानवी शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ताप येणे, डोळे लाल होणे, डोकेदुखी, सांधेदुखी आणि स्नायू दुखणे, मळमळ होणे, पोटदुखी आदी स्वरूपाच्या तक्रारी दिसत आहेत.

या उपाययोजना करा...

  • पाणी उकळून व गाळूनच प्या

  • रस्त्यावरील उघड्यावरचे अन्नपदार्थ व पाणी टाळा

  • स्वच्छता राखा, शौचालयानंतर आणि जेवणापूर्वी हात साबणाने धुवा

  • उघडी जखम असल्यास पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालू नका

  • लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या

  • घराच्या आसपास साफसफाई ठेवा

सध्या जुलाब, उलटी, पोटदुखी व कावीळ या जलजन्य आजारांचे रुग्ण वाढलेले आहेत. याचे कारण दूषित पाणी व दूषित अन्नाचे सेवन हे आहे. इतर रुग्णांच्या तुलनेत या रुग्णांचे प्रमाण २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहे. त्यासाठी अधिक स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे.

- डॉ. सिध्दार्थ शिंदे,

भवानी पेठ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.