रावेत, ता.१८ ः मुंबई - बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील समीर लॉन्सजवळ असलेल्या श्री धर्मनाथ महाराज उड्डाणपुलाखाली वाहतूक सिग्नल नसल्यामुळे परिसरातील रहदारी दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत आहे. या चौकात सातत्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि अत्यावश्यक सेवांचा खोळंबा होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून स्थानिक नागरिकांनी अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण दिवे उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
रावेत, किवळे, पुनावळे, ताथवडे या भागातील संपूर्ण अवजड वाहतूक समीर लॉन्स चौकातून वळविण्यात आली आहे. या परिसरावर वाहतुकीचा भार प्रचंड प्रमाणात वाढला आहे. चौकात कोणतेही वाहतूक नियंत्रक दिवे नसल्याने अनेकदा वाहनचालक गोंधळात सापडतात आणि त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो. या चौकातून अग्निशमन सेवा, रुग्णवाहिका, पोलिस वाहनांनाही मार्ग काढताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराज उड्डाणपुलाखाली वाहतूक नियंत्रक दिव्यांची उभारणी तातडीने केली गेल्यास अपघात टाळता येतील. वाहतूक सुरळीत होईल आणि नागरी सुविधा वेळेवर पोहोचू शकतील. या संदर्भात प्रशासनाने तातडीने पावले उचलावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
स्थानिक रहिवासी दीपक भोंडवे म्हणाले, ‘‘आम्ही अनेक वेळा महापालिका व वाहतूक पोलिस विभागाला वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्याबाबत निवेदन दिले आहे. पण, आजतागायत कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. महापालिका प्रशासनाने हा प्रश्न त्वरित सोडविण्यासाठी सहकार्य करावे.’’
वाहतूक पोलिस निरीक्षक महेंद्र कदम म्हणाले, ‘‘या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्याबाबत नागरिकांनी प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे सादर करावे. महापालिका प्रशासन ही व्यवस्था करून देईल.’’