जिल्ह्यात स्टॉप डायरिया मोहीम
रत्नागिरी, ता. १८ : जिल्ह्यात बालमृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने स्टॉप डायरिया मोहिमेचा जिल्हास्तरीय प्रारंभ झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. तुषार कुंभार यांच्या उपस्थितीत कोकणनगर येथील नागरी प्राथमिक आरोग्यकेंद्रात हा कार्यक्रम झाला.
या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, नागरी प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित, पीएचएन श्वेता तारये, प्रिया पेडणेकर, आरोग्य साहाय्यक चेतन शेटे, तुषार साळवी, भाटकर, शितोळे, यश फाउंडेशनचे विद्यार्थी व प्रशिक्षक, सर्व आरोग्य कर्मचारी, आशा गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका तसेच लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.
या अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये १६ जून ते ३१ जुलैदरम्यान ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये होणाऱ्या अतिसार आजाराविषयी जनजागृती, ओआरएस आणि झिंक गोळ्यांचे वितरण, स्वच्छतेबाबत सूचना तसेच घरोघरी संपर्क उपक्रम राबविण्यात येणार आहेत.