आयपीएल स्पर्धेतील एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयला दणका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी लवादाच्या निर्णयाविरुद्ध बीसीसीआयची याचिका फेटाळून लावली. माजी फ्रेंचायझी कोच्चि टस्कर्स केरळ आणि बीसीसीआय यांच्यातील सुरू असलेल्या वादात महत्त्वाचा निकाल दिला. न्यायमूर्ती आरआय छागला यांनी बीसीसीआयचे आव्हान फेटाळून लावत म्हटले आहे की, लवादाच्या निर्णयावर पुन्हा समीक्षा केली जाणार नाही. हा निर्णय योग्य त्या पुराव्यांच्या आधारावर दिला गेल आहे. त्यामुळे श्रीमंत क्रिकेट बोर्डाला आता 538 कोटी रुपये कोची टस्कर्स केरळला द्यावे लागणार आहेत. दहा वर्षांपूर्वी लवादाचे न्यायमूर्ती आर.सी. लाहोटी यांनी फ्रँचायझीच्या बाजूने निकाल दिला होता. न्यायालयाने बीसीसीआयने भरपाई म्हणून संघाला 538 कोटी रुपये द्यावेत असा आदेश दिला होता. केसीपीएलला 384 कोटी तर आरएसडब्ल्याला 153 कोटी देण्याचे आदेश दिले होते. बीसीसीआयने लवादाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
वर्ष 2011 च्या मोसमात आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या ‘कोची टस्कर्स केरळ’ संघाची मालकी ‘रेंदेव्हू स्पोर्ट्स वर्ल्ड’ आणि ‘कोची क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्याकडे होती. पण पहिल्याच मोसमानंतर सप्टेंबर 2011 मध्ये गव्हर्निंग कौन्सिलनं शिस्तभंग कारवाईखाली बाहेरचा रस्ता दाखवला होता. फ्रेंचायझी बीसीसीआय करारांतर्गत आवश्यक बँक गॅरंटी जमी करण्यास अपयशी ठरली होती. तेव्हा बीसीसीआयने कोच्चि टस्कर्स फ्रेंचायझी बंद केली. या निर्णयाला कोच्चि फ्रेंचायझीने चुकीचं असल्याचं सांगितलं.
फ्रेंचायझीला बँक गॅरंटी नुतनीकरण करण्यात अपयश आलं असल्याचं बीसीसीआयने सांगितलं होतं. 26 मार्च 2011 पर्यंत हमी बँके जमा करायची होती. पण सहा महिन्यानंतर 156 कोटी रुपये कराराची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे बीसीसीआयने 19 सप्टेंबर 2011 झालेल्या वार्षिक बैठकीत फ्रेंचायझी बंद करण्याचा निर्णय घेतला. बोर्डाच्या या निर्णयाविरुद्ध केसीपीएल आणि आरएसडब्ल्यूने 2012 मध्ये लवादाकडे दाद मागितली. 2015 मध्ये लवादाने सांगितलं की, बीसीसीआयने कराराचे उल्लंघन केले आणि हमी रक्कम चुकीच्या पद्धतीने वसूल केल्याचा निर्णय दिला.
कोच्चि टस्कर्स केरळ हा संघ रेंडेझव्हस स्पोर्ट्स वर्ल्डने 333.2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (1533 कोटी रुपये) च्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक बोलीवर विकत घेतला होता. परंतु एका हंगामातच या टीमला आयपीएलमधून काढून टाकण्यात आले. महेला जयवर्धनेच्या नेतृत्वाखालील संघात ब्रेंडन मॅक्युलम, रवींद्र जडेजा, मुथय्या मुरलीधरन, आरपी सिंग आणि श्रीशांतसारखे या सारखे दिग्गज खेळाडू होते.