Solapur News : ज्येष्ठ लेखक,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचं सोलापूर येथील त्यांच्या राहत्या घरी बुधवारी (ता.18) निधन झालं आहे. गेल्या 30 मार्चला त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
वन्यजीव अभ्यासक, ज्येष्ठ लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांचा जन्म सोलापूरच्या गिरणी कामगारांच्या घरात झाला होता. त्यांना सर्वत्र अरण्यऋषी म्हणून ओळखले जातात. वनाधिकारी म्हणून सरकारी नोकरी करतच त्यांनी वन, वन्यजीव आणि पक्षीशास्त्र या विषयांवर स्वत:ला वाहून घेतलं होतं.
मारुती चितमपल्ली यांनी राज्य सरकारच्या वनविभागात 30 वर्ष नोकरी केली. या काळात ते मेळघात व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक देखील होते. या प्रकल्पासह कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य यांच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.