भारतातून जगभरात विमानसेवा देणाऱ्या काही कंपन्यांकडून विमानांच्या देखभाल-दुरुस्तीबाबत दाखवली जाणारी सजगता अनुकरणीय आहे.
दुर्घटना शक्यतो घडूच नये, याची सर्वोच्च खबरदारी घेणे हे प्रगत व्यवस्थेचे लक्षण. तरीही दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडलीच तर त्यामागच्या कारणांचा कसून शोध घेणे, आढळलेल्या त्रुटी दूर करून सर्वांचा विश्वास पुनःस्थापित करणे, हेही चांगल्या व्यवस्थेकडून अपेक्षित असते.
अहमदाबाद-लंडन या विमानाला नुकत्याच झालेल्या अपघातानंतर भारतात या बाबतीतील चित्र नेमके काय आहे? अपघाताचे नेमके कारण समजण्यास वेळ लागेल, हे खरे. परंतु आपल्याकडील सर्व विमानांची तांत्रिक तंदुरुस्ती, देखभालीची यंत्रणा, सुरक्षात्मक उपाय, तज्ज्ञांशी सल्लामसलत अशा विमानवाहतुकीच्या अनेक पैलूंबाबत काय उपाय योजले जात आहेत, याचा सर्वंकष आढावा घेऊन तो लोकांपर्यंत मांडणे आवश्यक आहे. सक्षम अधिकृत यंत्रणेकडून असा संवाद झाला तर अफवांना आपोआपच लगाम बसू शकेल. भारतात सध्या हवाई वाहतुकीचा मोसम अनुकूल नाही.
अहमदाबाद-लंडन बोईंग-७८७ ड्रीमलायनर उडताक्षणीच अपघातग्रस्त होऊन २७१ जण मृत्युमुखी पडण्याची घटना घडल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे. विमानवाहतुकीतील प्रश्न एखाद्या संसर्गजन्य आजाराप्रमाणे पसरत आहेत. विमानांची उड्डाणे ऐनवेळी रद्द करणे किंवा विमाने हवेतून परत फिरण्याच्या प्रकारामध्ये गेल्या तीन-चार दिवसांमध्ये दखल घेण्याइतपत वाढ झाली आहे.
सध्या भारतातील अनेक शहरांतील हवामान स्थिर नाही. कुठे तीव्र उष्णतामान, कुठे धो-धो पाऊस, तर कुठे वादळाची धुमश्चक्री. त्यात भर पडली आहे ती १२ जूनच्या अपघातानंतर कुठलेही विमान उड्डाणासाठी सक्षम आहे की नाही, याची तपासणी नेहमीपेक्षा अधिक सजगतेने आणि नियमांवर बोट ठेवून करण्याची.
‘नागरी विमान वाहतूक महासंचालनालया’च्या (डीजीसीए) मते १२ जूननंतर ‘एअर इंडिया’च्या ताफ्यात असलेल्या ३३ पैकी २४ ‘बोईंग ७८७ ड्रीमलायनर’ची सर्व सुरक्षा निकषांवर तपासणी पूर्ण झाली आहे. या विमानांमध्ये सुरक्षेसंबंधातील कोणत्याही त्रुटी नसल्याचा निर्वाळा ‘डीजीसीए’ने दिला आहे.
केंद्र सरकारने केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीला अहमदाबाद-लंडन बोईंग-७८७ ड्रीमलायनरच्या अपघाताविषयी अहवाल सादर करायला तीन महिने लागतील. तीन वेगवेगळ्या स्तरांवर समांतरपणे चालणाऱ्या चौकशांमध्ये कोणता समान निष्कर्ष आढळून येतो, त्यावरून अपघाताची नेमकी कारणे स्पष्ट होतील.
अशा स्थितीत ‘डीजीसीए’ने ‘एअर इंडिया’च्या ताफ्यातील सर्व ड्रीमलायनरना केवळ देखभाल-दुरुस्तीच्या निकषांवर तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र देण्याची घाई का दाखवली, असा प्रश्न उपस्थित होतो. बारा जूनच्या अपघातानंतर उडालेल्या किंवा उडण्याचे धाडस एकवटू न शकलेल्या ‘बोईंग’बाबत ‘डीजीसीए’ची प्रशस्ती मेळ खात नाही.
अहमदाबादेतील अपघातानंतर विमान प्रवाशांच्या मनात जेवढी भीती निर्माण झाली आहे, तेवढीच धाकधूक वैमानिक आणि विमान कंपन्यांमध्येही झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच विमानाच्या आणि पर्यायाने प्रवाशांच्या सुरक्षेशी कुठलीही तडजोड होणार नाही, याची काळजी घेत अनेक १२ जूननंतर अनेक आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली.
परिणामी आठवड्याभरात ‘एअर इंडिया’ची डझनावारी विमाने ऐनवेळी रद्द झाली. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली असली तरी असुरक्षित आकाशापेक्षा जमिनीवर सुरक्षित असल्याच्या भावनेने ऐनवेळीच्या गैरसोयीमुळे प्रवाशांच्या प्रतिक्रियांमधील संतापाची धग नेहमीप्रमाणे तीव्र नव्हती. तांत्रिक त्रुटींमुळे विमानांचे उड्डाण रद्द होणे किंवा आकाशातून परत फिरण्याचे प्रकार नित्याचेच असतात.
मोठा विमान अपघात झाला की, पुढची काही दिवस माध्यमे आणि सर्वसामान्य नागरिक संवेदनशील होऊन सामान्य वाटणाऱ्या बातम्यांचेही गांभीर्य वाढते. सध्या तसे झाले आहे. खपवून घेतल्या जाणाऱ्या छोट्या-छोट्या तांत्रिक अडचणी आधी गंभीरपणे घेतल्या जात नव्हत्या.
पण १२ जूननंतर ‘एअर इंडिया’च्या विमानांच्या आजारी पडण्याचे प्रमाण अचानक वाढले. पूर्वी विमानांमध्ये उद्भवणाऱ्या लहान-सहान तांत्रिक समस्या काही दिवसांसाठी टाळल्या जात होत्या.
आता त्यांच्यावर तडजोड करण्याची जोखीम पत्करणे परवडणारे नसल्यामुळेही उड्डाणे रद्द होण्याचे प्रकार वाढीस लागले असण्याची शक्यता आहे. काही दिवसांनंतर धास्ती संपुष्टात येईल. तज्ज्ञांच्या मते विमानात उद्भवणाऱ्या कोणत्या तांत्रिक अडचणी किती काळासाठी खपवून घेतल्या जाऊ शकतात, याचेही नियम असतात.
पण समस्या जुजबी असली तरी तिच्याकडे एका दिवसासाठीही डोळेझाक करता येत नाही. त्यामुळे नियमपुस्तिकेवर बोट ठेवून तांत्रिक अडचणी आणि देखभालदुरुस्तीचा प्राधान्यक्रम ठरविला जातो. विमाननिर्मिती करणाऱ्या संबंधित कंपन्यांकडून सुटे भाग हवे तेव्हा उपलब्ध होत नाहीत.
विमानाच्या देखभाल-दुरुस्तीशी संबंधित अशा अडचणी आणि त्यावरच्या उपाययोजनांचे स्वरूप जगभरात सर्वत्र सारखेच आहे. पण काही आंतररराष्ट्रीय विमानकंपन्यांनी अपघातांच्या किंवा विमानात उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या बाबतीत आपल्या प्रतिमेवर कधी शिंतोडे उडू दिले नाहीत. अशा कंपन्यांकडून विमानांच्या देखभाल-दुरुस्तीबाबत दाखवल्या जाणाऱ्या सजगतेचे अनुकरण करण्याची गरज आहे.