तात्या लांडगे
सोलापूर : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना असंख्य पुरस्कार मिळाले, राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारही मिळाला. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे साहित्यावरील काम सुरूच होते. मृत्यूपूर्वी बुधवारी (ता. १८) सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी पाणी मागितले. त्यावेळी ‘आता मला जाण्याची परवानगी द्या, माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या’ असे शेवटचे शब्द उच्चारले. हे सांगताना पद्मश्रींचे पुतणे श्रीनिवास चितमपल्ली हे भावूक झाले होते.
वन अधिकारी म्हणून पद्मश्री चितमपल्ली यांनी ३६ वर्षे सेवा केली. त्यानंतरही ते २९ वर्षे जंगलातच राहिले. राज्य शासनासह विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दिल्लीला पुरस्कार घ्यायला जाण्यासाठी त्यांना तब्येत साथ देत नव्हती, पण पुतण्या श्रीकांत यास घेऊन ते दिल्लीला गेले. त्यानंतर ते घरी आले, पण तब्येत बिघडल्याने २ मे रोजी त्यांना मार्कंडेय रूग्णालयात दाखल करण्यात आले.
आठ दिवसांच्या उपचारानंतर ते घरी आले. घरी नियमित पुस्तक वाचन, लेखन सुरूच राहिले. २० दिवसांपूर्वी त्यांचे हिमोग्लोबिन कमी झाल्याने त्यांना पुन्हा मार्कंडेय रूग्णालयात ॲडमिट करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती. बुधवारी त्यांची तब्येत जास्तच खालावली. डॉक्टर घरी येऊन तपासून गेले. दूध घेऊन झोपल्यानंतर रात्री सातच्या सुमारास त्यांनी पुतण्याला पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर त्यांनी ‘आता मला जाण्याची परवानगी द्या’ असे भावनिक शब्द उच्चारले. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पुस्तकांची साथ सोडली नाही. अजूनही ते दररोज वाचन आणि लिखाण करीतच होते, असे पुतणे श्रीनिवास यांनी सांगितले.
आम्ही सगळे भाऊ एकत्रितच राहिलो, तुम्हीही एकमेकांची साथ सोडू नका
पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना तीन भाऊ होते. ते सगळेजण बालपणापासून विवाहानंतर देखील एकत्रितच राहायला होते. मागील सहा वर्षांपासून अरण्यऋषी हे पुतणे श्रीनिवास व श्रीकांत यांच्या अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मणिधारी एम्पांयरमधील घरी राहायला होते. मृत्यूपूर्वी ते म्हणाले, आम्ही चौघेही भाऊ शेवटपर्यंत एकत्रित राहिलो, तुम्हीही एकमेकांची साथ सोडू नका’.