News9 Global Summit Dubai Edition: यूएईसाठी भारत सर्वात विश्वासू पार्टनर, व्यापारापासून AI पर्यंत चर्चा
GH News June 19, 2025 06:10 PM

टीव्ही 9 नेटवर्कतर्फे दुबईमध्ये ‘न्यूज 9 ग्लोबल समिट’चे दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आले. या समिटची थीम भारत-यूएई भागीदारी:समृद्धी आणि प्रगतीसाठी अशी आहे. या समिटला अनेक नामवंत आणि प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली. यात भारत-यूएई भागीदारीच्या माध्यमातून व्यापार ते तंत्रज्ञानापर्यंतच्या विविध पैलूंवर मान्यवरांनी आपले विचार मांडले.

CEPA मुळे द्विपक्षीय संबंधांना चालना

सतीश कुमार सिवान यांनी CEPA (Comprehensive Economic Partnership Agreement) कराराने भारत आणि यूएईच्या द्विपक्षीय संबंधांना कशाप्रकारे बळकटी दिली, याबाबत माहिती दिली. हा करार केवळ ८८ दिवसांत इतक्या विक्रमी वेळेत झाला. दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी होऊन हा करार साइन करण्यात आला. CEPA मुळे भारताला मोठा फायदा झाला आहे. कारण यूएईने टॅरिफमध्ये कपात केल्याने भारताच्या निर्यातीला चालना मिळाली. विशेषतः टेक्सटाइल, जेम्स अँड ज्वेलरी, फूड अँड ॲग्रीकल्चर, आणि ऑटोमोबाइल या क्षेत्रांना याचा मोठा लाभ झाला आहे.

२०२२ मध्ये साइन झालेल्या CEPA चा मुख्य उद्देश २०३० पर्यंत नॉन-ऑइल ट्रेड १०० अब्ज डॉलरपर्यंत नेणे हा आहे. या करारामुळे दोन्ही देशांना फायदा झाला असून, त्याचे परिणाम आश्चर्यकारक आहेत. CEPA साइन होण्यापूर्वी २०२१-२२ मध्ये द्विपक्षीय व्यापार ७० अब्ज डॉलर होता, जो २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला. हा करार झाल्यानंतर १६ टक्के वाढ दिसून आली आहे.

यूएईची भारताकडे पाहण्याची दृष्टी

Hamdan AlShamsi Lawyers & Legal Consultants चे संस्थापक आणि वरिष्ठ भागीदार हमदान अलशम्सी यांनी भारत-यूएई संबंधांवर भाष्य करताना भारताचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, यूएई भारताला एक विश्वसनीय भागीदार म्हणून पाहतो. दोन्ही देशांमधील विश्वास आता अधिक दृढ विश्वासात बदलला आहे. भारतीय वंशाचे संयुक्त अरब अमिरातीस्थित उद्योजक सिद्धार्थ बालचंद्रन यांनी भारत आणि यूएईची भागीदारी मैत्रीच्या पलीकडे जाऊन बंधुत्वाच्या नात्यात बदलली असल्याचे सांगितले.

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष अमेया प्रभू यांनी सांगितले की, यूएई हे स्टार्टअप्ससाठी एक उच्च मार्जिन बाजारपेठ आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संदर्भात त्यांनी विशेषतः यूएईचे कौतुक केले. यूएई हा एकमेव देश आहे, जिथे सरकारने AI साठी एक स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे. हे एक भविष्याभिमुख दृष्टिकोन आहे, जो खूप चांगला आहे, कारण AI आता सर्वत्र आहे, असे अमेया प्रभू यांनी म्हटले.

ईएमआयआरचे संस्थापक आणि सीईओ ट्रेव्हर मॅकफार्लेन यांनी भारत-यूएई भागीदारीवर आपले विचार व्यक्त केले. अस्थिर जगात भारत आणि यूएई हे असे दोन देश आहेत, जे मजबुती आणि एकत्र काम करू शकतात, असे ट्रेव्हर मॅकफार्लेन म्हणाले. पुढील पाच वर्षांत जग कसे बदलेल आणि AI चा त्यावर कसा परिणाम होईल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ज्ञानापासून श्रेष्ठत्वापर्यंतच्या शर्यतीत AI जिंकेल, असे सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.