हिंदू धर्मात आषाढ आणि श्रावण महिना हा अत्यंत शुभ मानला जातो. आषाढ महिन्यात पंढरीची वारी निघते. तर श्रावणात भगवान शंकराची उपासना केली जाते. त्यामुळे या दोन महिन्यांना विशेष महत्व आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का आषाढ आणि श्रावण महिन्यात नवीन नवरीचे माहेरी जाणे अत्यंत शुभ मानले जाते. यामागे कारणही तसेच आहे.
श्रावणात अनेक प्रथा, परंपरा आणि श्रद्धा आजही पाळल्या जातात. या महिन्यात स्त्रिया उपवास करतात. तर लग्नानंतरच्या पहिल्या श्रावण महिन्यात नवविवाहित वधू आपल्या आईच्या घरी जाते. याचे कारण म्हणजे मुलगी ही घरची लक्ष्मी मानली जाते. मात्र तिचे लग्न झाल्यानंतर ती सासरी निघून जाते. म्हणून श्रावण महिन्यात मुलगी घरी येणे म्हणजे लक्ष्मी घरी येण्यासारखे मानले जाते.
शिवाय वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी नववधू माहेरी जाते. या काळात नवीन लग्न झालेल्या स्त्रियांनी शंकर आणि विठ्ठलाची उपासना करून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी चांगले असते. शिवाय या दिवसात वातावरणात बदल झालेले असतात. पावसाच्या दिवसात माहेरच्या आरामदायक वातावरणाचा आनंद घेण्याची संधी नववधुंना मिळते.