पावसाळा सुरु झाला की आहाराची, तब्येतीची काळजी घेणे फार गरजेचे असते. कारण पावसाळ्यातच अनेक आजारांना आमंत्रण मिळते. या ऋतूत चुकीच्या आहाराचे सेवन केल्याने किंवा सतत बाहेरचं खाल्ल्याने उलट्या, जुलाब आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. या ऋतूत आहाराची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. पावसाळ्यात बाहेरचे उघडे अन्न खाणे टाळा, कारण हा ऋतू माश्या आणि डासांच्या वाढीसाठी अनुकूल असतो. पण बऱ्याच जणांना हे माहित नसेल की पावसाळ्यात काही भाज्यांचे सेवन करणेही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे या भाज्या पावसाळ्यात शक्यतो न खाण्याचा सल्ला दिला जातो.
काही भाज्या पावसाळ्यात विषासारख्या आरोग्यावर परिणाम करतात.
या ऋतूत भाज्यांचे सेवन देखील खूप काळजीपूर्वक करावे लागते. एका वृत्तानुसार पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता आणि पाऊस हे बॅक्टेरिया आणि बुरशीसाठी अनुकूल वातावरण असतं. या वातावरणात अन्न दूषित होते आणि रोगांचा धोका देखील वाढतो. पोषणतज्ञ रुजुता दिवेकर यांनी देखील याबद्दल बऱ्याचदा सांगितले आहे. पावसाळ्यात लसूण आणि कांदा यासारख्या भाज्यांचे सेवन देखील कमी केले पाहिजे. चला जाणून घेऊया की या ऋतूत कोणत्या भाज्या खाऊ नयेत, कोणत्या भाज्या विषासारख्या आरोग्यावर परिणाम करतात.
हिरव्या पालेभाज्या खाऊ नये पालक, कोबी सारख्या पालेभाज्या पावसाळ्यात खाऊ नयेत. पावसाळ्यात चिखल, कीटक आणि ओलावा यामुळे या भाज्या लवकर संक्रमित होतात. जर त्या व्यवस्थित स्वच्छ केल्या नाहीत तर त्यांचे हानिकारक जंतू आपल्या पोटात जाऊ शकतात ज्यामुळे आजारी पडण्याची किंवा पोट खराब होण्याची शक्यता असते.
मशरूम खाणे टाळा मशरूम हे पौष्टिक अन्न आहे, परंतु पावसाळ्यात त्यांचे सेवन करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. पावसाळ्यात भरपूर ओलावा असतो, ज्यामुळे मशरूम खूप लवकर कुजण्यास सुरुवात होते. कुजलेल्या मशरूममुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते. त्यांचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. पावसाळ्यात मशरूम खूप काळजीपूर्वक खा,किंवा खाणे सरळ टाळा.
फुलकोबी आणि ब्रोकोली खाणे टाळा फुलकोबी आणि ब्रोकोली या क्रूसिफेरस कुटुंबातील भाज्या आहेत ज्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत, परंतु पावसाळ्यात त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. या भाजीची रचना अशी आहे की त्यात लहान खोबणी असते ज्यामध्ये पावसाळ्यात ओलावा आणि कीटक सहजपणे अडकतात. या कीटकांना स्वच्छ करणे कठीण होते, कारण फक्त धुवून त्या पूर्णपणे स्वच्छ करता येत नाहीत. जर या भाज्या योग्यरित्या शिजवल्या नाहीत तर पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो, विशेषतः ज्यांची पचनसंस्था संवेदनशील असते.
वांगी टाळा वांगी ही सहसा एक चविष्ट आणि पौष्टिकतेने समृद्ध भाजी असते. परंतु पावसाळ्यात ती खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. पावसाळ्यात ओलावा आणि मातीमुळे, वांग्यांमध्ये लवकर किड लागते, ज्यामुळे अन्न विषबाधा किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.