-rat१९p२६.jpg-
२५N७१७२५
मंडणगड : तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने नैसर्गिक संपन्नता नष्ट होत आहे.
---
(टीप- ग्राफीक पद्धतीने घ्यावे.)
निसर्गसंपन्न मंडणगड वृक्षतोडीमुळे उद्ध्वस्ताकडे
अतिरेकी कृती पर्यावरणाच्या मुळावर; ऋतुचक्रात बिघाड, वनजीवन विस्कळित
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १९ः निसर्गसंपन्न मंडणगड तालुक्यात गेल्या दशकात विविध कारणांनी करण्यात आलेली भरमसाठ वृक्षतोड तालुक्यातील पर्यावरणाच्या मुळावर उठली आहे. तालुक्याचे नैसर्गिक वातावरण उद्ध्वस्ताकडे जात आहे. यामुळे तिन्ही ऋतुचक्रात झालेले बिघाड तालुकावासीय सध्या अनुभवत आहेत. स्थानिक प्रजातीचे शिवण, किंजळ, आईन, आपटा, शेवर, खैर आदी वृक्षांची मानवी वापरासाठी कत्तल करण्यात आल्याने वन्यजीवन विस्कळित झाले, त्याचा थेट परिणाम घटत चाललेल्या शेतीवर झाला आहे.
पावसाळ्यात अतिवृष्टी किंवा दुष्काळ यांच्या अनुभवासह गेल्या पाच वर्षात सरासरी तापमानात सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यावर्षी उन्हाळ्यात तापमान सातत्याने ४० अंशाच्यावर पोहचले. यास ग्लोबल वार्मिंगइतकीच झाडांची तोड कारणीभूत असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे. तालुक्याच्या अर्थकारणास गती देणाऱ्या आर्थिक क्रियांमध्ये जंगले व त्यावर आधारित व्यवसायांचा समावेश होतो. आल्हाददायक वातावरणासाठी मंडणगड प्रसिद्ध असल्याने महानगरांमधून सेकंड होमसाठी मोठी गुंतवणूक गेल्या दोन दशकात झाली आहे. आजही जमीन खरेदी व विक्रीचे मोठे व्यवहार तालुक्यात सुरू आहेत; मात्र विकासाच्या गतीने बदलत जाणाऱ्या या प्रक्रियेत तालुक्याची पर्यावरणस्नेही ही ओळख हरवून गेली आहे. सामान्य शेतकऱ्यास आर्थिक मिळकतीचा कुठलाही स्रोत नाही, असे कारण पुढे करत वनविभागाच्या प्रचलित कायद्यामध्ये संबंधितांनी वेळोवेळी पळवाटा शोधल्या. चार दशकात कुठल्याही कारणांनी जंगलतोड थांबलेली नाही.
१२ गावांना स्थलांतराच्या नोटिसा
तालुक्याची डोंगराळ संरचना लक्षात घेता डोंगरउतारावरील झाडांची तोड झाल्याने जमिनीची धूप झाली व भूस्खलन धोका अनेक ठिकाणी निर्माण झाला आहे. यंदा तालुक्यातील बाराहून अधिक गावातील नागरिकांना पावसाळ्यात सुरक्षितस्थळी स्थलांतरांच्या नोटिसा महसूल विभागाने दिल्या आहेत.
वृक्षलागवडीची आकडेवारी पुढे आली नाही
पर्यावरण रक्षणाची जबाबदारी असलेला वनविभाग आजही आपल्या कर्तव्यात कसूर करताना दिसतो. तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्षकटाई होताना सहज निदर्शनात येते. वृक्षतोडीचे परवाने देत असताना वृक्षलागवडीचे उद्दिष्टही निर्धारित करण्याची तरतूद असतानाही तोडीनंतर लागवडी व जतन यांची जबाबदारी असली तरी वनविभागाने लागवडीचे कर्तव्यात मोठी कसूर केल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला, हे वास्तव आता कोणीही नाकारू शकत नाही. वृक्षतोडीच्या समोर केलेल्या लागवडीची कोणतीही आकडेवारी सार्वजनिक झालेली नाही.
बंदीकाळातही विनापरवाना तोड
लाकूडकटाईच्या गेल्या दशकात वनविभागाकडून परवानगी मिळवलेल्या तोडीच्या कितीतरी अधिक तोड वेळोवेळी कार्यरत असलेल्या वनाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने अथवा संगनमत केल्याचा संशय व्यक्त झाला. अगदी पावसाळ्यातील बंदीकाळातही तालुक्यात विनापरवाना तोड राजरोसपणे आजही सुरू आहे. या संदर्भातील शेतकरी व नागरिकांच्या तक्रारीकडे वनविभाग सोईस्करपणे दुर्लक्ष करत आल्याने आगामी काळात तालुकावासियांना पर्यावरणाच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
वनविभागाकडे नाही साप पकडण्याचा अनुभव
लागवड व तोडीची आकडेवारी देण्यास टाळणाऱ्या येथील वनाधिकारी व कर्मचारी हे वरिष्ठ कार्यालय व जाहीर कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. नागरिकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही. शहरातील दोन इमारतीत विषारी साप शिरल्याने शहरात दहशत व भीतीचे वातावरण असताना येथील कर्मचाऱ्यांकडे सापांना पकडून सुरक्षित अधिवास सोडण्याचा अनुभव नाही. त्यामुळे साप पकडण्याचे साहित्य उपलब्ध असतानाही परिस्थिती जैसे थे आहे. एका जिल्हा परिषद शाळेत नाग शिरलेला असताना संबंधित शिक्षकांनी वनविभागाकडे संपर्क साधला असता कर्मचारी रजेवर असल्याने कोणतीच मदत न मिळाल्याने विद्यार्थीही सापाच्या दहशतीखाली वावरत आहेत.
कोट
डोंगरावरील वृक्षतोडीमुळे मातीची धूप होत आहे. त्यामुळे वाहून येणाऱ्या गाळामुळे नद्या, ओढ्यांची पात्रे उथळ बनत आहेत. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाचे मूळ कारण जंगलतोड आहे. प्राण्यांचे नैसर्गिक अधिवासच नष्ट होत असल्याने प्राणी लोकवस्तीच्या दिशेने सरकू लागले आहेत. एका बाजूला वृक्षतोड तसेच दुसऱ्या बाजूला दरवर्षी हजारो एकर वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने तालुका भयाण होत चालला आहे. वनविभाग नैसर्गिक बांधिलकीच्या कर्तव्याशी बांधील आहे का, असा प्रश्न आहे.
- रघुनाथ पोस्टुरे, सामजिक कार्यकर्ते.