मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी राज्यातील जनतेचीच इच्छा आहे. जनता जी इच्छा व्यक्त करणार ते आम्ही करणार, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीला हिरवा कंदिल दाखवला आहे. पण मनसे आणि ठाकरे गटाची युती झाली तर त्याचा काही फायदा होणार नाही, असे सत्ताधाऱ्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. पण मनसे ठाकरे गट युतीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंतही राज ठाकरेंच्या सतत संपर्कात आहेत. ज्यामुळे याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्याचे अब्दुल्ला असा उल्लेख केला आहे. (Sanjay Raut blunt criticism of मराठी, calling him Thane’s Abdullah)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार सजय राऊत यांनी शुक्रवारी (ता. 20 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ठाकरे बंधू एकत्र येणार का, याबाबतच्या चर्चा होत आहेत, अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी याबाबत राऊत म्हणाले की, हा दोन्ही भावांचा विषय आहे. त्यात हा ठाण्याचा अब्दुल्ला का नाचतोय? भाजपासोबत जाण्यासाठी ते उतावीळ झाले होते. आता दोन भाऊ एकत्र येत असल्याने त्यांचा तिळपापड का होत आहे. त्यांची अघोरी विद्या चालत नाही काय? एकत्र येण्याबाबत दोन भाऊ आणि महाराष्ट्राची जनता निर्णय घेईल. दोन समान विचारांचे पक्ष महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र येत असतील, तर यांचा तिळपापड का होतो. गुवाहाटीत पुरलेली शिंगे आणि कापलेले रेडे त्यांना यश प्राप्त करून देत नाहीत. आमचे निर्णय आम्ही घेऊ. तुम्ही स्वतःचा विचार करा. फडणवीसांनी तुमची काय अवस्था केली आहे. त्यांचे पायपुसणे करून टाकले आहे. त्यांचे पोतेरे झाले आहे आणि लवकरच मातेरीही होणार आहे, असे टीकास्त्र राऊतांनी डागले.
तसेच, ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत आम्ही क्षेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक आहोत. मराठी माणसाच्या एकजुटीमुळे देशात नवी उर्जा निर्माण होणार आहे. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, हे लक्षात ठेवायला हवे. आम्ही महाराष्ट्रासाठी नेहमीच झटत आहोत. महाराष्ट्रद्रोही शक्तींविरोधात आम्ही ठामपणे उभे आहोत. ठाकरे ब्रँड हा देशातील सुप्रीम ब्रँड आहे. शिंदे, फडणवीस, अमित शहा कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही, असे राऊतांनी स्पष्टपणे सांगितले. तर, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपाने त्यांच्या राजकारणासाठी याआधी राज ठाकरे यांची मदत घेतली आहे. ती त्यांची ताकद नव्हती म्हणून मदत घेतली का? आता दोन भाऊ, मराठी जनता एकत्र येत असल्याने भाजपा आणि शिंदे गटाचा जळफळाट, तिळपापड होत आहे. त्यामुळे डोममधला डोमकावळा फडफडत होता. दोन भाऊ एकत्र येण्याची धास्ती त्यांनी घेतल्याने अशी विधाने ते करत आहे. एकत्र येण्याचा निर्णय हा राजकीय आहे. तसेच हा मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे ठाकरे बंधू यावर सांमजस्याने योग्य ती भूमिका घेतील, असे यावेळी संजय राऊतांनी म्हटले.