मुंढवा : मुंढवा-केशवनगर भागातील वाहतूक कोंडी, रस्त्यावरची अतिक्रमणे, विस्कळित पाणीपुरवठा, कचरा, ड्रेनेज आदी नागरी समस्यांमुळे नागरिकांना जगणे नकोसे झाले आहे. या प्रश्नांकडे पुणे महानगरपालिकेचे लक्ष वेधून प्रलंबित विकासकामे सुरू होण्यासाठी ‘आरपीआय’च्या वतीने केशवनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
विद्यमान आमदार केवळ सत्कार घेण्यासाठी येतात, मात्र पाणी, उड्डाणपूल, रस्त्यांचे रुंदीकरण, वाहतूक कोंडी या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नाही. महापालिकेचे टॅक्स भरूनही सुविधा मिळत नसल्याचे महिला व ज्येष्ठ नागरिकांनी या वेळी सांगितले. आंदोलनात महानगरपालिकेचा घोषणा देऊन निषेध करण्यात आला.
हडपसर विधानसभा अध्यक्ष महादेव दंदी यांनी यासाठी पुढाकार घेतला. या वेळी आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब जानराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी देवेंद्र भाट, , केशवनगरचे माजी सरपंच संदीप लोणकर, आरपीआय पुणे शहर पदाधिकारी महादेव कांबळे, रामभाऊ कर्वे, आशिष आल्हाट, संतोष खरात, कालिदास गायकवाड, संतोष दुधाणे, संकेश पवार, राहुल कांबळेसंतोष पाखरे, अशोकराव येवले, अमर घुले, अजित घुले, मयूर खलसे, बाळासाहेब घुले, ओमकांत बोने, संतोष शिंदे, प्रकाश जावळे, सुधाकर कांबळे, दत्ता भंडारी, अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, केशवनगर, मुंढवा, मांजरी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब जानराव म्हणाले की, शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरांत घुसते. दरवर्षी गटारे स्वच्छ करण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. प्रशासनाने किती गाळ काढला, किती गटारे स्वच्छ केली, याची माहिती प्रशासनाकडे नाही. हे सर्व कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार घडत आहे. पालिकेचे अधिकारी कार्यालयात बसतात, लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही.