Kharif Sowing : वरुणराजाची जिल्ह्यावर वक्रदृष्टी; मृग नक्षत्र संपतेय, मात्र खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या
esakal June 20, 2025 08:45 PM

विनोद बोडखे

रिसोड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने या वर्षी खरीप हंगामाची तयारी केली. काही शेतकऱ्यांनी बँकाचे कर्ज, तसेच ज्या शेतकऱ्यांना बँकांचे कर्ज मिळाले नाही, अशा शेतकऱ्यांनी मिळेल त्या मार्गाने पैसे उसनवार, कर्जाने घेऊन बी-बियाणे खतांची तयारी करत मृग नक्षत्रात पेरणी होईल अशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा मात्र फोल ठरली.

मृग नक्षत्रात पेरणी झाल्यास उत्पन्न भरघोस होत असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. मात्र मृग नक्षत्र अवघ्या दोन दिवसांमधे संपुष्टात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याची खरीप पेरणीची सारी भिस्त ही आर्द्रा नक्षत्रावर आहे. त्यामुळे वरुण राजाची जिल्ह्यावर वक्रदृष्टी झाल्याची चर्चा शेतकरी वर्गात ऐकायला मिळते आहे.

उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊसाने चांगली सुरुवात केली होती. मात्र मृग नक्षत्रात जिल्ह्यामधे पावसाने दांडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी अल्प पावसावर पेरणी केली असून त्यांची पिके धोक्यात आल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.

जिल्हा प्रशासनाने १०० मिली मीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, या बाबतीत मोलाचे मार्गदर्शन केले. परंतू पाऊस येईल या आशेने काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्याने पीक वाचवण्यासाठी त्यांची मोठी कसरत होत आहे. जिल्ह्यात केवळ १६.३३ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. आता या पेरण्याही उलटण्याच्या मार्गावर आहेत. येत्या चार दिवसात पाऊस पडला नाही तर जिल्ह्यातील शेकडो एकर क्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

Pune News : कोंढापुरीत विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपविले; पोलिसांकडून सर्व अंगाने तपास पिण्याच्या पाण्याची समस्या

जिल्ह्यातील पाणी साठ्यामध्ये तोकडा पाणी साठा शिल्लक राहिल्याने, तसेच उपलब्ध असलेल्या जलस्रोतांची पाणी पातळीत कमालीची घट झाल्याने पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते.

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

मान्सूनपूर्व पावसावर शेतकऱ्यांनी हळद, आले तसेच काही प्रमाणात सोयाबीन, तूर आदी पिकांची पेरणी केली. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

तालुकानिहाय पाऊस

  • तालुका १९ जून पर्यंत

  • पर्जन्यवृष्टी (मि.मी.)

  • वाशीम ४२.३

  • रिसोड ३५.८

  • मालेगाव ४०.३

  • मंगरूळपीर ३६.६

  • मानोरा नोरा ३४.४

  • कारंजा ४०.१

तालुकानिहाय पेरणी

  • वाशीम १८.५४ टक्के

  • रिसोड २७. ५६ टक्के

  • मालेगाव ३१. ८८ टक्के

  • मंगरूळपीर ३. ४९ टक्के

  • मानोरा २.३३ टक्के

  • कारंजा ०. ५३ टक्के

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.