नवी दिल्ली : सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय गुंतवणूकदारांसमोर उपलब्ध असतात. गुंतवणूकदारांकडून बँकेत मुदत ठेव, शेअर बाजारात गुंतवणूक, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली जाते. एसआयपीद्वारे अनेक जण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, पोस्टाच्या बचत योजना देखील लोकप्रिय आहेत. पोस्टाच्या बचत योजनांवर गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास असल्याचं पाहायला मिळतं. पोस्टाची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजना सुरक्षित आणि करबचतीसाठी फायदेशीर योजना आहे. पोस्टाच्या या योजनेत गुंतवलेले पैसे केवळ सुरक्षित राहत नाहीत तर त्याच्यावर निश्चित व्याज मिळतं. याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होता.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही पोस्ट ऑफिसची बचत योजना आहे. या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेत 5 वर्ष गुंतवणूक कायम ठेवावी लागते. एकदा पाच वर्ष गुंतवणूक केल्यानंतर या योजनेतून पैसे काढता येत नाहीत. या योजनेत वार्षिक 7.7 टक्के व्याज मिळतं. हे व्याज कम्पाऊंडिंगद्वारे दिलं जातं.
या योजनेत किमान 1000 रुपये आणि त्यापुढं 100 च्या पटीत जितकी गुंतवणूक करायची आहे तितकी करता येईल. कमाल किती रक्कम गुंतवावी याची मर्यादा नाही. म्हणजेच तुमची जितकी बचत असेल त्याच्या प्रमाणात परतावा मिळेल.
जर एखाद्या गुंतवणूकदाराच्या मुलाचं वय 10 वर्ष आहे, तर त्या मुलाच्या नावानं राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचं खातं उघडता येईल. जर मुलाचं किंवा मुलीचं वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर आई वडील मुलांच्या वतीनं खातं उघडू शकतात. यामुळं मुलांना लहाणपणापासून बचत करण्याची सवय लागेल.
जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर वार्षिक 7.7 टक्के चक्रवाढ व्याजदरानुसार 5 वर्षात ही रक्कम 724517 रुपये इतकी होईल. तुम्हाला पाच वर्षात 224517 रुपयांचं व्याज मिळेल. हे व्याज ठेव कालावधी पूर्ण झाल्यानंतर मिळेल. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही एक सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारी योजना आहे. प्रामुख्यानं मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची विश्वासार्ह योजना आहे. या योजनेत व्याज दरवर्षी जमा रकमेत जमा होतं. पुढील वर्षी जमा झालेल्या रकमेवर व्याज मिळतं.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत लहान मुलांच्या नावानं खातं उघडता येतं. 10 वर्षांपेक्षा मुलांचं वय कमी असल्यास आई वडील ते खातं चालवू शकतात. पाच वर्षांच्या अगोदर खातं बंद करायचं असल्यास मूळ रक्कम परत केली जाईल. व्याज दिलं जात नाही. या योजनेतील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असून सरकारकडून योजनेचं दायित्व घेतलं जातं.
जर तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आणि अधिक जोखीम न घेता चांगला परतावा हवा असेल तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र चांगला पर्याय आहे. जर तुमच्याकडे मोठी रक्कम असेल तर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा पर्याय वापरू शकता.
आणखी वाचा