कात्रज - गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे कात्रज घाट परिसरात निसर्गसौंदर्य फुलून आलं आहे. डोंगराळ भागावर चहूबाजूंनी पसरलेली हिरवाई, वाहणारे लहान ओहोळ आणि थंड हवामान यामुळे कात्रज घाटाने जणू हिरवा शालूच पांघरला आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घाट परिसरातील रानवाटा, झुडपे आणि झाडे नव्या पालवीने सजली आहेत. पुणे-सातारा महामार्गावर असलेला हा घाट नेहमीच वाहतुकीसाठी महत्त्वाचा असतो, मात्र सध्या तो पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
सकाळी सकाळी घाटातून प्रवास करणाऱ्यांना धुक्याची चादर, थंड वाऱ्याची झुळूक आणि निसर्गसंपन्न दृश्य अनुभवायला मिळत आहेत. सकाळच्या वेळी धुक्यामुळे हे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून दिसते. त्यातच मोरांच्या ओरडण्याचा आवाज लक्ष वेधून घेतो. कात्रज जुन्या बोगद्याशेजारी असलेली माकडे लक्ष वेधून घेतात.
रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी येथे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांची वर्दळ वाढत आहे. काहीजण कुटुंबीयांसह येथे येऊन फोटोग्राफी करीत आहेत, तर काहीजण निसर्गाचा शांत आनंद घेताना दिसत आहेत. सध्या कात्रज घाटात जणू निसर्गाने स्वतःचे प्रदर्शन मांडले आहे.
विपुल वनसंपदेच्या हिरवाईने नटलेला डोंगर, डांबरी रस्त्याचा घाटमार्ग, गवताचा पसरलेला हिरवा शालू, खळखळणारे ओढे, सांडवे भरून वाहणारा पाझर तलाव, उंचावरून पाणी पडताना दिसणारा धबधबा आणि पक्ष्यांचा किलबिलाट असे हे मनमोहक सौंदर्य घाट परिसरात पहायला मिळते. अनेकजण प्रवासास निघालेले असताना रस्त्याच्या कडेला उभे राहून या निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना दिसतात.
शहराच्या दक्षिण प्रवेशद्वारावर कात्रज डोंगररांगा, भिलारेवाडी वन विभागाच्या ९०० हेक्टर क्षेत्रावर विपुल वनसंपदा आहे. ऐतिहासिक कात्रज जुना बोगदा, आंबील ढग माथा, डोंगर उतारावरून वाहणारे झरे, गुजर-निंबाळकरवाडी व भिलारेवाडी पाझरतलावात पाणी आल्याने विलोभनीय दृश्य घाटातून दिसते. तसेच, घाट रस्त्यालगत एका ठिकाणी उंच धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.
अनेक ठिकाणी पर्यटक धोकादायक पद्धतीने रस्त्याच्या कडेला वाहने उभी करुन उभा राहत असल्याचे दिसून येते. अशा ठिकाणी दिशादर्शक आणि सूचनांचे फलक तसेच रस्त्याच्या कडेला धोकादायक ठिकाणी बॅरिगेटिंग करणे गरजेचे आहे. मात्र, वननिभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
प्रतिक्रिया
अनेकवेळा आपण पर्यटनासाठी दूरवर फिरत असतो. परंतु कधीकधी आपल्या आजूबाजूलाही हाकेच्या अंतरावर अशा प्रकारे सुखद अनुभव देणारी ठिकाणे असतात. त्याचबरोबर, वाढत्या गर्दीमुळे घाटात कचरा आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण होऊ नये म्हणून पर्यावरणप्रेमींनी स्वच्छतेचे भान ठेवत घाट परिसराचा आनंद घ्यायला हवा. कात्रज घाटातील सध्याची दृश्ये विलोभनीय आहेत.
- संतोष धुमाळ, पर्यावरणप्रेमी