Ashadhi Wari : संतांच्या चरणी पुणेकर नतमस्तक; पालखी सोहळे पुण्यात मुक्कामी
esakal June 21, 2025 04:45 AM

पुणे - ‘तुका म्हणे धावा पांडुरंगा, आहे भक्तीचे ठायी रंगा...” याची अनुभूती आज पुणेकरांनी अन लाखो वारकऱ्यांनी घेतली.

पावसाच्या सरी अंगावर घेत, टाळ-मृदंगाच्या गजरात, पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी पंढरपूरला निघालेले वारकरी पुण्यात दाखल झाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगत्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पावन पादुकांचा पुण्यात मुक्कामी प्रवेश झाला आणि पुण्यनगरी भक्तीच्या रंगात रंगून गेली.

'ज्ञानोबा-तुकाराम' च्या जयघोषाने आसमंत दुमदुमला, तर पुणेकरांनीही सेवा-स्वागतासाठी आपली ऊर्मी उधळली. रस्त्यांवरून वाहणारा भक्तीसागर, पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन झालेले भाविक आणि संतांच्या सान्निध्याने भारलेले वातावरण... हे दृश्य अनुभवत पुणेकरांना जणू पंढरीच्या दर्शनासच साक्षात्कार झाला.

संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सकाळी सात वाजता आळंदीतून तर संत तुकाराम महाराज यांची पालखी पहाटे पाच वाजता आकुर्डीतून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. सकाळच्या वेळी पावसाचा जोर जास्त होता, त्यामुळे अंगावर मेनकापड पांघरून वारकरी पंढरीची वाट चालण्यास सुरवात केली.

पण सकाळी ११ नंतर पाऊस कमी झाला नंतर ऊन पडल्याने वारकऱ्यांना दिलासा. त्यानंतरही अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत वारकरी भजनात तल्लीन होऊन पुण्याच्या दिशेने येत होते. पावसाची तमा न बाळगता संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी केली होती.

संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने दुपारी एक वाजून १५ मिनीटांनी बोपोडी पुणे शहराच्या हद्दीत प्रवेश केला. येते अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी स्वागत केले. तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याने दुपारी १ वाजून ४५ मिनीटांनी कळस येथे पुणे महापालिकेच्या हद्दीत प्रवेश केला.

तेथे आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. प्रदीप चंद्रन आदी उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तुकाराम पादुका चौक येथे तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेतले.

उत्स्फूर्त स्वागत

वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणेकरांनी कसलीही कसर सोडली नाही. पुणेकरांकडून ठिकठिकाणी पाणी आणि खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात येत होते. काही ठिकाणी पावसापासून संरक्षणासाठी मेणकापडांचे वाटपही करण्यात आले.

या सोहळ्यात सहभागी झालेले नागरिक भक्तीमध्ये तल्लीन झाले होते. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा-तुकाराम असे भजन करत, टाळ मृदंगाच्या तालावर पावले खेळत होते. अनेक किलोमीटर अंतर चालूनही आलेला थकवा विसरून विसाव्याच्या ठिकाणी फुगडी खेळणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह अचंबित करणारा होता.

सायंकाळी पाचच्या सुमारास तुकाराम महाराज यांची पालखी पाटील इस्टेट येथे पोचली, तर त्याच वेळी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने विश्रांतवाडीवरून पुढे येऊन संगमवाडीच्या हद्दीत प्रवेश केला. मुख्य शहरात हे पालखी सोहळे कधी येणार याची वाट पाहत नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. पादुकांचा रथ येताच, दर्शनासाठी मोठी गर्दी झाली.

गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम पादुका चौक येथे आरती झाली. लकडी पूल ओलांडतून संतांची पालखी टिळक चौकात आल्यानंतर या ठिकाणीही भव्य स्वागत करण्यात आले.

रात्री उशिरा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदिरात तर, संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात समजा आरतीनंतर रात्रीच्या मुक्कामासाठी विसावल्या. याठिकाणीही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

स्पीकरपासून सुटका

पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी राजकीय पुढाऱ्यांकडून स्वागत कक्ष उभारले जातात. त्यावेळी मोठमोठ्याने गाणी लावली जात असल्याने वारकऱ्यांना भजन म्हणताना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हे प्रकार थांबवावेत अशी मागणी बैठकीत करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिकेच्या हद्दीत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे वारकऱ्यांच्या भक्तीसेवेत अडथळा आला नाही. केवळ पोलिसांतर्फे सूचना देण्यासाठी लावलेला स्पीकर सुरू होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.