>> तुषार अंडाकृती
सांगलीत राधिका या पत्नीने आपला पती अनिल लोखंडेचा वटपौर्णिमेच्या दिवशीच खून केला आहे. दुसरीकडे सोनमने आपल्याच प्रियकरासोबत मिळून आपल्याच पतीचा काटा काआहे. वर वर ही एक एक घटना दिसतेय, पण जेव्हा या सगळ्या घटना एकत्र पाहिल्या तर आपण कुठे उभे आहोत याचा विचार केला तर धक्कादायक वास्तव समोर येतंय. विवाह संस्था कुठे चुकतायत याचा धांडोळा घेण्यासाठी केलेला हा छोटा लेखप्रपंच.
2019 ची गोष्ट. नगरच्या पाथर्डीच्या एका तरुणाचे लग्न झाले. नवीन नवरी म्हणाली की, मला देवदर्शनाला जायचंय. म्हणून लग्न झाल्याच्या तिसऱयाच दिवशी नवरा नव्या नवरीला कानिफनाथ मंदिरात घेऊन गेला. बाईक लावण्यासाठी मुलगा पार्किंगकडे गेला. आल्यावर बघतो तर बायको गायब. त्याने दुकानदारांना विचारलं तेव्हा त्यांनीही काहीच माहीत नसल्याचं सांगितलं. अखेर नवऱयाने मंदिर प्रशासनाकडे धाव घेतली. प्रशासनाच्या अधिकाऱयांनी सीसीटीव्ही चेक केला तेव्हा नवऱ्याला धक्काच बसला. नवरी आपल्या प्रियकरासोबत बाईकवरून पळून गेली होती. तिचा प्रियकर यांच्या मागेच होता आणि ती त्याला इशारा करत होती. वेळ साधून हातावर तुरी देत नवरी पळून गेली होती. नंतर त्या नवऱयाने पोलीस तक्रारही केली नाही. त्या मुलाचे नशीब एवच की त्या मुलीने त्याचा जीव नाही घेतला. त्याचं काय झालं असेल? त्याला दुसरी मुलगी मिळाली असेल का? समाजात त्याला कुणी विचारत असेल का? बायको पळून गेली म्हणून त्याला समाजाने नावं ठेवली नसतील ना?
काही वर्षांपूर्वीसुद्धा आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृतीत मुलगा मुलीला पसंत करत होता. त्यात मुलीची पसंती ना पसंती पाहिली जायची नाही आणि त्याच वेळी हुंडा प्रकारही जोमात होता (जो आजही आहे). आज मुली शिकल्या, आर्थिकदृष्टय़ा स्वतच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. त्या वेळी तिलाही आपला मनासारखा जोडीदार मिळावा अशी अपेक्षा असते. पण बऱयाच वेळा या अपेक्षा अवास्तव असतात. खूप साऱया मुली या चांगला मुलगा शोधण्यापेक्षा चांगलं
पॅकेज शोधतात. त्या पॅकेजमध्ये चांगला पगार, स्वतचं घर, गाडी, बंगला या गोष्टी असतात. त्यात मुलगा निर्व्यसनी आणि सुस्वभावी नसला तरी चालतो. कारण पॅकेज चांगलं असतं. अशा वेळी पालकही उत्साहाने तयार होतात आणि हुंडाही द्यायला तयार असतात. पुण्यात गाजलेलं वैष्णवी हगवणे प्रकरण ताजंच आहे. त्यांचा प्रेमविवाह होता. वैष्णवीच्या लग्नात जेवणाची एक प्लेट हजार रुपयांना होती अशी माहिती एका नातेवाईकाने दिली होती. मुलीचे पालक खर्च करत आहेत, मग मुलाकडची मंडळीही खुशाल हवं ते मागतात. या मागण्या कधीच संपत नाहीत आणि हुंडाबळीसारख्या घटना घडतात.
एकीकडे हुंडाबळी आणि दुसरीकडे आता अरेंज मॅरेजमध्ये मुलांचे बळी चाललेत. मुलीच आपल्या प्रियकरांच्या साथीने आपल्या ‘सत्यवाना’ला संपवायला निघालेत. त्यांची ही प्रेम प्रकरणं कधी लग्नापूर्वीची असतात तर कधी लग्नानंतरची असतात. या गोष्टींसाठी जबाबदार ठरतात एक म्हणजे पालक आणि दुसरे सरकार. आता तुम्ही म्हणाल, यात सरकारची काय चूक? सरकारची चूक अशी की असे गंभीर गुन्हे करण्यासाठी हे लोक धजावतातच कसे? यांना कुठल्याही कायद्याचा धाक का नसतो? असं एखादं कृत्य आपल्या हातून झालं तर पोलीस आपल्याला सोडणार नाही याची त्यांना भीतीच नसते, असंच या घटनांमधून दिसतंय. असे कृत्य करणाऱयांना कडक शिक्षा झाल्याशिवाय त्यांना जरब बसणार नाही.
पालकांची या सगळ्यात मोठी चूक म्हणता येईल. पालकांनी आपल्या मुलांशी संवाद वापाहिजे. आपल्या पाल्याला आपल्याशी बोलताना भीती वाटत असेल तर हे त्या पालकांचं अपयश आहे. मुलं एका दिवसात मोठी होत नाहीत. वयात आल्यावर त्यांच्याशी संवाद साधल्यास त्यांची मनस्थिती, त्यांच्या गरजा, त्यांच्या भावना लक्षात येतील. त्यानंतरच त्यांची मानसिकता लक्षात येईल. मुलींच्या पालकांनी अरेंज मॅरेज करण्यापूर्वी आपल्या मुलीचं कुठे अफेअर आहे का याची आवर्जून चौकशी करावी. असे न केल्यास दोन कुटुंब उद्ध्वस्त झालेली आपण पाहिलेली आहेत. जर मुलगा चांगला असेलच तर लग्न करून देण्यात काय अडचण आहे? समाज नावं ठेवेल, समाजात छी थू होईल या भीतीने आपण आणखी संकटं नाही ओघेऊ शकत. मुलांनीही लग्न करण्यापूर्वी मुलीशी योग्य संवाद साधावा. जर तिच्या मनात आणखी कोणी असेल तर तुम्हाला मागे हटण्याची संधी आहे.
या मोठय़ा समस्यांवर संवाद हा साधासरळ उपाय आहे. त्यानंतरही प्रश्न सुटत नसतील तर सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट आणि काऊन्सिलरचा पर्याय आहेच. समाज काय विचार करेल हा प्रश्न विचारण्यापेक्षा आपल्या मुलीच्या आणि मुलांच्या मनात काय हे समजून घेतलं तर नक्कीच अशा घटना घडणार नाही.