सोनिया गांधींनी केंद्रावर टीका केली
Marathi June 22, 2025 11:24 AM

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सध्या इस्रायल आणि इराण यांच्यात सशस्त्र संघर्ष भडकला आहे. इराण हा भारताचा दीर्घकाळापासूनचा मित्रदेश आहे. तथापि, या संघर्षात भारताने त्या देशाच्या बाजूने एकही विधान केलेले नाही. भारताने आपल्या आतापर्यंतच्या धोरणांना अशा प्रकारे फाटा दिला आहे, अशी टीका काँग्रेसच्या नेत्या आणि विरोधी पक्षांच्या आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.

त्यांनी एक लेख प्रसिद्ध केला असून त्यात आपले मतप्रदर्शन केले आहे. अद्यापही वेळ गेलेली नाही. भारताने या संघर्षाविरोधात अजूनही आपला आवाज उठवावा. पॅलेस्टाईन आणि इराण यांच्यावर अन्याय केला जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी विनाशाचा मार्ग स्वीकारला आहे. गाझा पट्टी आणि इराण या मुद्द्यांवर नैतिक आणि शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. तथापि, तेथे जे घडत आहे, ते मूल्यांच्या विरोधात आहे, असे प्रतिपादन करुन सोनिया गांधी यांनी डोनाल्ड ट्रंप यांच्यावरही टीका केली आहे.

शरणागतीचा आरोप

इराण आणि पॅलेस्टाईन यांच्या अधिकारासाठी आवाज उठविण्याचे भारताचे गेल्या साठ वर्षांचे धोरण या केंद्र सरकारने धाब्यावर बसवले. ही धोरण शरणागती असून भारताने या संबंधात न्यायोचित भूमिका घ्यावी. भारताने आपले प्रदीर्घ काळापासून चालत आलेले धोरण सोडण्याचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.