दोन गटांमध्ये हिंसाचार झाल्यानंतर तणाव
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बॉम्बस्फोट झाला. लाभपूर ब्लॉकजवळील हटिया गावात अचानक दोन गटांमध्ये हिंसाचार झाल्यानंतर हा स्फोट झाला. यादरम्यान दोन जणांना जीव गमवावा लागला. शनिवारी या घटनेची माहिती देताना पोलिसांनी हिंसाचारात सहभागी असलेले दोन्ही गट गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर परिसरात हिंसाचार उसळला. बीरभूमचे एसपी अमनदीप यांनी या घटनेत दोन जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. या स्फोटात अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तथापि, पोलिसांनी जखमींची संख्या जाहीर केलेली नाही.