अखेर संजय राऊतांचा संयम सुटला, ठाकरे गट-मनसे युतीबाबतच्या संदीप देशपांडेंच्या वक्तव्यावर म्हणाल
Marathi June 22, 2025 03:25 PM

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये मनसे (MNS) आणि शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) युतीच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. दोन्ही पक्षातील नेते युतीबाबत सकारात्मक असतानाच मनसे पक्षाचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून आलं. संदीप देशपांडे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरुन संजय राऊतांवर हल्लाबोल करत त्यांना ताटातला चमचा म्हटलं होतं. युतीबद्दल दोन्ही पक्षप्रमुख निर्णय घेतील ताटातल्या चमच्याने ताटात राहावं असं देशपांडे यांनी म्हंटलं होतं. त्यानंतर आता देशपांडे यांनी केलेल्या टिकेला खासदार संजय राऊत यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे.

राजकारणात माणसाने नेहमी संयमी आणि आशावादी असावं. काही लोकांना अजून त्याचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. नुसता उथळपणा करून राजकारण चालत नाही. जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो, मराठी माणसाच्या न्यायी हक्काचा प्रश्न असतो तेव्हा संयम ठेवावा लागतो. काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही. कोण काहीही म्हणेल येड्या गबाळ्या सारख, त्याला अर्थ नाही, अशा शब्दांत राऊत यांनी संदीप देशपांडे यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणालेत संजय राऊत?

मी वारंवार सांगतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते आणि भाऊ निर्णय घेतील.आज बोलत आहेत, ते राजकारणामध्ये उशिरा आले आहेत. ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबांना मी जवळून ओळखतो म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहिती नाही. त्यांच्या म्हणण्याला येथे अर्थ नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या म्हणण्याला अर्थ आहे. कोण काही म्हणेल त्याला अर्थ नाही. आमच्याकडचं कोणी काही म्हणालं नाही, त्यांच्याकडे कोण काही म्हणणार नाही. अशा पद्धतीने एकेकाळी महाविकास आघाडी सुद्धा होणार नाही हे कसे एकत्र येऊन सरकार बनवतील अशी भूमिका होती. पण तरीही महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना याचं सरकार बनलं. मुख्यमंत्री झाला. तीन वर्ष सरकार उत्तम प्रकारे चालू होतं. राजकारणामध्ये माणसाने कायम संयमी आणि आशावादी असायला पाहिजे काय लोकांना आधी त्याचे प्रशिक्षण घेण्याची गरज आहे, असं म्हणत राऊतांनी देशपांडेंना टोला लगावला आहे.

पुढे राऊत म्हणाले, नुसता उथळपणा करून राजकारणात कुठेही चालत नाही. विशेषतः जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न मराठी माणसाच्या न्याय हक्काचा प्रश्न असतो, तेव्हा संयम आणि त्याग या दोन गोष्टी असल्याशिवाय महाराष्ट्राचा नेतृत्व आपण करू शकत नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा अभ्यास केला तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सुद्धा विभिन्न विचाराचे लोक एकत्र आले. कम्युनिस्ट पक्षाचे सर्व गट एकत्र आले, त्यांच्या भूमिका वेगळा होत्या. पण हे सगळे महाराष्ट्राच्या मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी एकत्र आले. हा इतिहास आहे. राजकारणात तरुण लोक आता येत आहेत, त्यांनी थोडासा त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असंही पुढे संजय राऊत म्हणालेत.

संदीप देशपांडे काय म्हणाले होते?

विश्वप्रवक्ते म्हणाले की, आम्हाला प्रश्न विचारू नये. गल्लीपासून दिल्ली पर्यंत उत्तर देणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये. केवळ आजूबाजूचे चमचे बोलत आहेत. अद्यापपर्यंत उद्धव ठाकरे कधीही मनसेसोबतच्या युतीबाबत बोलले नाहीत. भाजप विरोधात मतदान करून एकेकाळी शिवसेनेचे 63 आमदार लोकांनी निवडून दिले, परंतु उद्धव ठाकरे भाजपच्या मांडीवर जाऊन बसले. त्यानंतर युतीला लोकांनी पाठिंबा दिला आणि ते शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले. जिथं त्यांच्या पक्षातील नेते त्यांना सोडून जात आहेत. त्यांच्या मनातील कळालं नाही आणि ते काय जनतेच्या मनात सुरू आहे ते ओळखणार, असा टोला संदीन देशपांडेंनी लगावला होता, त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=0t6k1wiqhjc

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.