पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रविवारी (ता. २२) पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे भवानी पेठ, नाना पेठेसह सोलापूर मार्ग रविवारी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. रविवारी पहाटेपासून वाहतुकीत बदल केला जाणार आहे, त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
हा सोहळा नाना पेठ व भवानी पेठेतून सोलापूरमार्गे पुढे मार्गस्थ होणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसर येथील गाडीतळ येथून दिवेघाटमार्गे सासवड मुक्कामी पोहोचणार आहे तर संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रस्त्याने लोणी काळभोर येथे मुक्कामी असणार आहे.
दोन्ही पालखी सोहळ्यांना वाहतुकीची अडचण येऊ नये, यादृष्टीने रविवारी पहाटेपासून पालखी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत केली जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.