पुणे : वाहतूक कोंडी व अपुऱ्या ‘चार्जिंग’मुळे ‘पीएमपी’च्या मान-हिंजवडी आगाराची प्रवासी सेवा विस्कळित झाली आहे. कोंडीमुळे गाड्या पूर्ण क्षमतेने ‘चार्ज’ होत नाहीत. त्यामुळे या बस वाटेतच बंद पडतात.
या आगारातून ३२ ई-बसचे संचलन होते. सकाळच्या सत्रात ‘चार्जिंग’ची अडचण नसते. दुपारच्या सत्रात मात्र अडचणी सुरू होतात. या सत्रातील आठ ते दहा बस आगारातच जास्त वेळ थांबतात. त्यामुळे त्या निर्धारित वेळेत फेऱ्या पूर्ण करू शकत नाहीत. परिणामी काही फेऱ्या रद्द करणे ‘पीएमपी’ प्रशासनाला भाग पडते.
ई-बस सेवा पर्यावरणपूरक असली तरी ‘चार्जिंग’ सुविधांतील अपुरेपणा व तांत्रिक अडचणींमुळे ‘पीएमपी’ला नियमित सेवा पुरविण्यात अडचणी येतात.
प्रवाशांची गैरसोयमान-हिंजवडी डेपोमध्ये पूर्ण क्षमतेने ‘चार्ज’ होत नसल्याने बस पूर्ण क्षमतेने धावत नाहीत. अनेकदा प्रवाशांना बसची वाट पाहत थांबावे लागते, अथवा खचाखच भरलेल्या बसमधून प्रवास करावा लागतो. परिणामी त्यांना असंख्य गैरसोयींना तोंड द्यावे लागते.
असे कोलमडते वेळापत्रकदुसऱ्या सत्रासाठी ई-बस दुपारी साडेबाराच्या सुमारास आगारात दाखल होणे आवश्यक
हिंजवडी परिसरातील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे बस दाखल होईपर्यंत दुपारी दोन ते अडीच वाजतात
प्रवासी सेवा बाधित होऊ नये म्हणून बस शक्य तेवढ्या लवकर ‘चार्ज’ करण्याचा प्रयत्न
एक ई-बस पूर्ण क्षमतेने ‘चार्ज’ होण्यास किमान दोन तास लागतात, मात्र तेवढा वेळ थांबणे शक्य नसल्याने ४० ते ५० टक्के ‘चार्जिंग’वर बस आगाराबाहेर काढणे भाग
अशा बसचे ‘चार्जिंग’लवकर संपून ती कधी रस्त्यातच बंद पडते
इतर काही वेळा फेऱ्या रद्द करणे भाग
अशा बस आगारात परत आणून पुन्हा ‘चार्जिंग’ची प्रक्रिया
बस पूर्ण ‘चार्ज’ होण्यासाठी जादा वेळ लागत असल्याने बस आगारातच
बस पूर्ण क्षमतेने का ‘चार्ज’ केली जात नाही, याची माहिती घेतली जाईल. काही तांत्रिक दोष आहे का, हेदेखील तपासले जाईल.
- दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे