Bhaskar Jadhav : ठाकरे गटातील नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. तसेच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत डावललं जात असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. क्षमतेप्रमाणे संधी दिली जात नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. शरद पवार यांची साथ सोडली हे मला कधीतरी चुकीचं वाटतं, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भास्कर जाधवांनी त्यांची खंत मांडली आहे, आता पक्षप्रमुख त्याची दखल घेतील, असं म्हटलंय. आता राऊतांच्या याच विधानाच समाचार भास्कर जाधव यांनी घेतलाय. राऊतांनी केलेल्या विधानावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिलीय.
शरद पवार यांची साथ सोडली, त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय, असं अजिबात नाही. तसं स्पष्टीकरण मी दिलेलं आहे. मी शरद पवार यांना सोडल्याचा निर्णय चुकीचा होता, हे मी स्पष्टपणे बोललो. पण मला त्याची खंत वाटतंय असं अजिबात नाही. मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं, मी तेव्हा बोललो. मी आजही बोलेन. उद्याही बोलेन. मला मंत्रिपद का मिळायला नको, हे मला कोणी सांगायला हवं. मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून काय रडत बसायचा का? उलटं लढायचं. मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी जे फुटून गेले त्यांच्याबरोबरही मी गेलो नाही. मी लढत आहे, अशी खदखद भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
भास्कर जाधव काय बोलले. हे त्यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही. पण अशा प्रकारे त्यांना मन मोकळं करायचं असेल तर ते पक्षाच्या व्यासपीठावर बोलायला काहीच हरकत नाही. ते आमचे जवळचे सहकारी आहेत. मित्र आहेत. शिवसेनेच्या वर्धापनदिनी व्यासपीठावर भास्कर जाधव यांनी भाषण केलं. त्यांना जे म्हणायचं आहे ते सातत्याने पक्षात त्यांची भूमिका मांडत असतात. यापुढेही ते त्यांच्या भूमिका मांडत राहतील. भास्कर जाधव यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पक्षप्रमुख त्यांची दखल घेतली.