Warkari Protest : कत्तलखान्याबाबत लेखी आदेश हवा, बंडातात्या कराडक; सरकारवर अविश्वास नाही, पण कार्यवाही करावी
esakal June 22, 2025 06:45 PM

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोशीजवळ कत्तलखाना होणार नसल्याबद्दल भाष्य केले, परंतु त्याचा अधिकृत लेखी आदेश येणे आवश्यक आहे. सरकारवर आमचा अविश्वास नाही, पण तत्काळ कार्यवाही करावी,’ अशी भूमिका ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी शनिवारी मांडली.

समस्त वारकरी संप्रदाय, संस्थान, संस्था आणि संघटनेकडून आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव नरहरी महाराज चौधरी, अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे कोकण प्रांताध्यक्ष भगवान महाराज कोकरे, हिंदू जनजागृती समितीचे संघटक सुनील घनवट, संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष नितीन महाराज मोरे, संत सोपानकाका पालखी सोहळा दिंडी समाज अध्यक्ष राम महाराज कदम आदी उपस्थित होते.

कराडकर म्हणाले, ‘‘मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे दुसऱ्या कत्तलखान्याचा प्रश्न मांडला होता. त्यांनीही कत्तलखाना होणार नाही, अशीच घोषणा केली होती, मात्र अधिकृत आदेश येण्यास चार महिने लागले. त्याची पुनरावृत्ती कशावरून होणार नाही?’’

‘वारकरी संप्रदाय सध्या सर्वात मोठा आहे. यावर्षी पावसाचे मोठे वातावरण आहे, पण वारकऱ्यांचा उत्साह कमी झाला नाही. गर्दीचा फायदा घेऊन अनेक लोक खोटे नाणे चालविण्याचा प्रयत्न करतात. वारकऱ्यांचा बुद्धीभेद करतात. आम्ही कोणत्या इतर संघटनेचा तिरस्कार करत नाही, पण मुळावरच घाव घालत असाल तर सहन करणार नाही,’ असेही त्यांनी सांगितले. चौधरी म्हणाले, ‘‘घटना घडतात, त्याला वाचा फोडण्याचे काम त्या त्या मंत्र्यांकडे केले आहे. प्रत्येक वेळी निवेदन देतो, पण असे किती वेळा करावे.

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाच्या प्रश्नाबाबत आश्वासन देऊन आठ महिन्यांचा कालावधी झाला. चंद्रभागा, तापी, गोदावरी हे जलस्रोत समाजातील सर्वांनाच उपयुक्त आहेत. त्यासाठी सरकारने लक्ष द्यावे. कत्तलखाना रद्द केल्याचा आदेश तत्काळ करण्यात यावा. वारकरी पंढरपूरला पोहोचण्याच्या अगोदर सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखी स्वरूपात आदेश द्यावेत. तसे झाले नाही तर वारकरी संप्रदाय अधिक उग्र स्वरूप धारण करेल.’’

मोरे म्हणाले, ‘‘अनेक संघटना-संस्था वारीत त्यांचा ‘अजेंडा’ मांडत असतात. प्रबोधनाच्या नावाखाली गैरसमज पसरवले जात आहेत. ज्या पद्धतीने पाकीटमार दिसल्यावर अटक करतात, तर मग संतांबद्दल गैरसमज पसरवणाऱ्यांवरही कारवाई करायला हवी.’’ स्वामी भारतानंद सरस्वती महाराज म्हणाले, ‘‘सरकारला आळंदी, इंद्रायणीचे महत्त्व सांगावे लागणे हे दुर्भाग्य आहे. कत्तलखाना हे धर्मविरोधी खूप मोठे षड्यंत्र आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे, परंतु त्यांना आश्वासने द्यावी लागतात. महापालिका आयुक्तांनी त्याबाबत तत्काळ लेखी आदेश काढावा.’’ कोकरे म्हणाले, ‘‘कत्तलखाना कुठेही होऊ देणार नाही. दिंडीला सरकारचे पैसे घेतात आणि हिंदू धर्मविरोधी भूमिका मांडतात. प्रबोधन करत नाहीत तर ते बुद्धिभेद करत आहेत.’’

स्वागतकक्ष, ध्वनिवर्धक कमी झाले

महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव नरहरी महाराज चौधरी यांनी सांगितले की, ‘स्वागतकक्ष आणि ध्वनिवर्धक न लावण्याच्या आमच्या मागणीला पुणेकरांनी साथ दिली. पुण्यापर्यंत पालखीमार्गावरील हे प्रमाण अतिशय कमी झाले. ज्या ठिकाणी ध्वनिवर्धक सुरू होते, त्या ठिकाणी वारकऱ्यांनी जाऊन ते बंद करण्यास सांगितले.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.