Vicky Ostwal : मोठ्या भागीदारीमुळेच समन्वय वाढतो; एमपीएल : रायगड संघाच्या ओसवालचे मत
esakal June 22, 2025 06:45 PM

पुणे : संघातील दोन सहकाऱ्यांमध्ये मोठी भागीदारी होते तेव्हा संघातील खेळाडूंमध्ये समन्वय वाढतो आणि हा समन्वय ऊर्जा देत तुम्हाला यशही मिळवून देतो, असे रायगड संघाचा खेळाडू विकी ओसवाल याने सांगितले.

कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध झालेल्या सामन्यात विकी याने ५४ चेंडूंमध्ये ७४ धावा फडकावत सामन्यास मानकरी हे पारितोषिक पटकाविले. हा सामना रायगड संघाने सहा गडी राखून जिंकला. या कामगिरीबाबत विकी याने सांगितले, हे पारितोषिक माझ्या एकट्याचे नसून माझ्या सहकाऱ्यांनी माझ्याबरोबर केलेल्या महत्त्वपूर्ण भागीदारीचेच आहे.

कारण क्रिकेटसारख्या सांघिक खेळामध्ये एकमेकांचे सहकार्य अधिक महत्त्वाचे असते. जेव्हा सामन्यांमध्ये महत्त्वाच्या क्षणी मोठी भागीदारी होते, त्या वेळी ही भागीदारी सामन्याचा निकाल निश्चित करणारी असते. तसेच अशा भागीदारीमुळे दोन्ही सहकाऱ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण होते, तसेच अशी भागीदारी एकमेकांवरील विश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त होते.

या सामन्यात धावबाद होता होता विकी वाचला. त्याविषयी तो म्हणाला, मिसफिल्डमुळे दुसरी धाव घेण्याची संधी आहे हे माझ्या लक्षात आल्यामुळे आम्ही ही धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आमची टक्कर झाली. त्यावेळी हेल्मेट तोंडावर आपटल्यामुळे काही क्षण माझ्या डोळ्यापुढे अंधेरी आली होती.

लक्षात आल्यानंतर मी पटकन क्रीजमध्ये पोहोचलो. दुखापतीवर उपचार घेत असताना मी मनोमन देवाचे आभार मानले आणि संघाला विजय मिळवण्यासाठीच मी वाचलो, असे मला वाटले. त्याच वेळी आपण संघाला विजयपथावर न्यायचे आहे, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवत मी फलंदाजी केली. सुदैवाने त्यानंतर माझे फटकेही खूपच चांगले बसले.

MPL Final 2025 : महाराष्ट्र प्रीमियर लीगची आज सांगता; दिमाखदार सोहळा, त्यानंतर अंतिम सामन्याचा थरार

पुणेरी बाप्पा विरुद्धच्या सामन्याविषयी तो म्हणाला, या संघाविरुद्ध साखळी गटात एक सामना मी गमावला असला तरी एक सामना आम्ही जिंकला आहे. त्यामुळे आम्हाला या संघाविरुद्ध विजय मिळवण्याची खात्री आहे. संघातील सर्व खेळाडू हा सामना जिंकण्यासाठी उत्सुक झाले आहेत. खेळाडूंचे मनोधैर्य अतिशय उत्तम आहे, त्यामुळे आमच्या संघावर कोणतेही दडपण नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.